सीमांकन प्रक्रियेपासून ग्रामपंचायत प्रशासनालाही अंधारात ठेवले ! – सरपंच, बांदा
सावंतवाडी – प्रस्तावित असलेल्या नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाविषयी ग्रामस्थ संभ्रमावस्थेत आहेत. पुणे येथील खासगी यंत्रणेद्वारे बांदा परिसरात महामार्गासाठी चालू असलेली सीमांकन प्रक्रिया आम्ही थांबवली. या प्रक्रियेपासून ग्रामपंचायत प्रशासनालाही अंधारात ठेवण्यात आले. या महामार्गामुळे बाधित होणारे शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थ यांना विश्वासात घ्यावे, ही आमची भूमिका आहे. यासाठी तातडीने विशेष सभेचे आयोजन करण्यात येईल. जनमताचा कल विचारात घेऊन ‘शक्तीपीठ महामार्गा’विषयीची भूमिका घोषित करू, असे बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
सरपंच प्रियांका नाईक म्हणाल्या, ‘शक्तीपीठ महामार्गाविषयीची आमची लढाई प्रशासनाशी आहे. महामार्गासाठी सीमांकन करतांना संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात घेणे आवश्यक होते; मात्र तसे झाले नाही. गावातील शेतकरी, व्यापारी, उद्योजक, तसेच अन्य ग्रामस्थ यांच्याकडून याविषयी ग्रामपंचायतीकडे चौकशी केली जात आहे. या महामार्गाविषयी कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही. विशेष सभेत स्थानिक जो निर्णय घेतील, त्यानुसार आमची भूमिका राहील. सभेत महामार्गाला स्थानिकांचा विरोध झाल्यास आम्ही स्थानिकांच्या सोबत राहू.’’
माजी उपसरपंच बाळू सावंत म्हणाले, ‘‘शक्तीपीठ महामार्गामुळे बांदा बाजारपेठ धोक्यात येणार आहे. मुळात विविध प्रकल्पांसाठी यापूर्वी भूमी संपादित झाल्या आहेत. महामार्गाविषयी परिपूर्ण माहिती दिली पाहिजे. यासाठी आम्ही प्रांताधिकारी, भूसंपादन अधिकारी, भूमी अभिलेख अधीक्षक यांना पत्र दिले आहे.’’