
ठाणे, १९ एप्रिल (वार्ता.) – राज्य सरकारने मराठी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा सक्तीची असा आध्यादेश घोषित केला होता. या विरोधात येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत हा अध्यादेश फाडून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. ठाणे विश्रामगृहसमोर १८ एप्रिलला हे आंदोलन करण्यात आले. त्या वेळी पोलिसांनी मनसैनिकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
या वेळी मोरे म्हणाले, ‘‘अन्य राज्यांमध्ये त्यांचीच राज्यभाषा ही महत्त्वाची मानली जाते; परंतु महाराष्ट्रात हिंदी भाषेला प्राधान्य का ? आम्ही राज्यशासनाने लादलेली ही सक्ती कधीच मान्य करणार नाही. मनसे ही नेहमी मराठी भाषा आणि माणसाच्या पाठीशी आहे.’’