(म्हणे) ‘पूर्वजांना ५ सहस्र वर्षे त्रास देणार्‍या मनुस्मृतीला विरोध व्हायला हवा !’

  • हिंदुद्वेषी जितेंद्र आव्हाड यांचा नेहमीप्रमाणे शासनाच्या निर्णयाला विरोध !

  • २९ मे या दिवशी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करणार !

मुंबई – ज्या मनुस्मृतीने स्त्रियांचे अधिकार नाकारले आणि ज्या मनुस्मृतीमुळे आपले पूर्वज ५ सहस्र वषेर्र् त्रासात जगले, तीच मनुस्मृती पुन्हा एकदा हे सरकार आणत आहे, यास तीव्र विरोध व्हायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी या मनुस्मृतीचे दहन केले, त्याच ठिकाणी, म्हणजे महाड येथे जाऊन २९ मे या दिवशी पुन्हा एकदा आम्ही मनुस्मृतीचे दहन करून सरकारचा निषेध करणार आहोत. त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे शरद पवार गटाचे आमदार आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. एस्.सी.ई.आर्.टी.ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्‍लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्याच्या विरोधात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हे विधान केले. (एकांगी माहिती प्रसारित करणारे जितेंद्र आव्हाड ! घटनाकार डॉ. आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले असले, तर याच मनुस्मृतीच्या  अभ्यासानंतर त्यांनी ‘हिंदू कोड बिल’ सिद्ध केले. हे आव्हाड का सांगत नाहीत ? – संपादक)

ते पुढे म्हणाले, ‘‘मनुस्मृतीने भारताचे वाटोळे केले, समाजात दुही माजवली, समाजामध्ये चातुवर्ण्याचा समावेश केला आणि जातीभेद निर्माण केला. स्त्रियांना तर सर्वांत घाणेरडी वागणूक देण्याची पद्धत मनुस्मृतीने जन्माला घातली, तीच मनुस्मृती परत आणली जात आहे.’’

संपादकीय भूमिका

  • कोणताही धर्मग्रंथ जाळणे, हा कायद्याने गुन्हा आहे. असे असतांना जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या दहनासंदर्भात असे विधान करणे, हे राज्यघटनाद्रोहीच होय ! पोलिसांना हे दिसत कसे नाही ?
  • जगभरात जिहादी आतंकवाद फोफावू देणारे किंवा त्याला प्रोत्साहन देणारे साहित्य दहन करण्याविषयी आव्हाड कधीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • एरव्ही इतरांना ‘विचारांचा प्रतिवाद विचारांनी करावा’, असे उपदेशाचे डोस पाजणारे पुरोगामी आता आव्हाड यांना मनुस्मृती दहन करण्यापासून रोखत त्यांना उपदेशाचा हा डोस पाजणार का ?