सेवेची तळमळ असलेल्या आणि सतत आनंदी रहाणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी (वय ४० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

पू. संदीप आळशी यांनी सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

कु. रूपाली हिने स्वत:ची शारीरिक स्थिती स्वीकारून आई-वडिलांची सेवा आणि सनातनच्या ग्रंथांशी संदर्भातील सेवा मनापासून केली. प्रारंभी ‘ही सेवा मला जमणार नाही, कठीण आहे’, असे तिला वाटत होते. याविषयी तिने मला मोकळेपणाने सांगितल्यावर ‘गुरूंनीच ही सेवा दिली आहे, त्यामुळे त्यांचा या सेवेसाठी संकल्प झाला आहे. या सेवेतून तुझा भाग्योदय होणार आहे’, असे मी तिला सांगितले होते. हे वाक्य तिने लक्षात ठेवून ती सेवा स्वीकारली आणि सेवा करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. ती मोकळेपणाने स्वत:च्या अडचणी सांगून त्यावर कसे प्रयत्न करायचे ? हे वेळोवेळी विचारून घेते आणि सांगितल्याप्रमाणे प्रयत्नरत रहाते. त्यामुळेच तीची जलद गतीने प्रगती होत आहे.

सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करतांना पू. संदीप आळशी

रामनाथी (गोवा) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांच्या जीवनात अक्षय्य (चिरंतन) आनंद देण्यासाठी साधना शिकवली आणि या मार्गावरून वाटचाल करतांना कित्येक साधक हा आनंद अनुभवून स्वत:ची आध्यात्मिक उन्नती करवून घेत आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे ११ मे २०२४ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका सत्संगाच्या माध्यमातून साधकांना याची आणखी एक प्रचीती गुरुकृपेने घेता आली. गुरूंप्रती अपार श्रद्धा, सेवेची तळमळ, सकारात्मकतेने परिस्थिती स्वीकारून सतत आनंदी रहाणे, आदी गुण असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणार्‍या सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी (वय ४० वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता एका सत्संगात घोषित करण्यात आली. या वेळी सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी यांची आई सौ. सरस्वती कुलकर्णी, भाऊ श्री. राहूल कुलकर्णी, तसेच ग्रंथ विभागात सेवा करणारे काही साधक उपस्थित होते. सुश्री (कु.) रूपाली यांचे वडील श्री. अरविंद कुलकर्णी हे आजारी असल्यामुळे या सत्संगाला उपस्थित राहू शकले नाहीत.

१. अशी झाली आनंदवार्तेची घोषणा !

११ मे २०२४ या दिवशी ग्रंथ विभागात सेवा करणार्‍या काही साधकांचा साधनेसंदर्भात सत्संग झाला. या सत्संगाला सनातनच्या ग्रंथांचे संकलक पू. संदीप आळशी आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ हेही उपस्थित होते. सत्संगात पू. संदीप आळशी यांनी काही साधकांचे चांगले प्रयत्न सांगितले. त्यात सुश्री (कु.) रूपाली यांचाही समावेश होता. त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सुश्री (कु.) रूपाली यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित केले. त्यानंतर पू. संदीप आळशी यांनी भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला.

२. आध्यात्मिक पातळी घोषित केल्यानंतर सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी यांनी व्यक्त केलेले मनोगत

प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) एखाद्याचे आयुष्य कसे पालटू शकतात, ते लक्षात आले. मला आताही असे वाटत नाही की, माझी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाली आहे; कारण माझ्यामध्ये पुष्कळ स्वभावदोष आणि अहं आहे. मला इतरांच्या आधाराची आवश्यकता वाटते. त्यामुळे मन निराश व्हायचे; पण ही निराशा त्रासामुळे नाही, तर स्वभावदोषांमुळे आहे, हे गुरुदेवांनी सांगितल्यावर आपण ते घालवण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवायला हवी, असे मला लक्षात आले.

पू. संदीपदादा यांनी मला वेळोवेळी प्रयत्नांसाठी मदत केली. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला आश्रमात रहाण्याची संधी मिळाली. गुरुदेवांनी माझी सूक्ष्मातून सर्वप्रकारे काळजी घेतली, यासाठी मला गुरुदेव आणि आश्रम यांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते.

३. सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी यांची कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

(बसलेले) श्री. अरविंद कुलकर्णी, सौ. सरस्वती कुलकर्णी, (उभे असलेले) श्री. राहूल कुलकर्णी अन् कु. रूपाली कुलकर्णी

३ अ. सौ. सरस्वती कुलकर्णी (आई)

कु. रूपाली हिची आध्यात्मिक प्रगती लवकर व्हावी, असे मला वाटत होते. ‘तिची स्वत:ची शारीरिक स्थिती नसतांना सेवा आणि घरच्यांना सांभाळणे हे सर्व कसे जमते ?’, असे मी तिला काळजीपोटी विचारायचे; पण तीच मला समजवायची की, ‘प.पू. आहेत, तर तेच काळजी घेणार, त्यामुळे आपण काळजी करायला नको.’ तिच्या वागण्या-बोलण्यात पूर्वीच्या तुलनेत चांगला पालट जाणवताे.

३ आ. श्री. राहूल कुलकर्णी (भाऊ)

कु. रूपाली हिची आध्यात्मिक प्रगती झाल्याचे पाहून आनंद वाटला. वडील आजारी असल्याने त्यांचे सर्वच करावे लागते, हे मला स्वीकारता येत नव्हते; पण ती सहजतेने स्वीकारून त्यांची सेवा मनापासून करते. ती आई-बाबा या दोघांचीही पुष्कळ चांगल्या प्रकारे सेवा करते. मी यामध्ये अल्प पडतो. गुरुदेवांनी यापूर्वी अनेकदा सांगितले होते की, ‘रूपाली नेहमी आनंदी असते.’ तिचे प्रयत्न पाहून २-३ दिवसांपासून तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के व्हायला हवी, असे वाटत होते.