सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने लांजा, जिल्हा रत्नागिरी येथील पू. (श्रीमती) माया गोखले (वय ७९ वर्षे) यांना झालेले लाभ !

१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्याने पू. (श्रीमती) माया गोखले यांचा सायटिकाचा त्रास न्यून होणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘मला पूर्वीपासून कंबरदुखीचा त्रास होता. मला अधिक वेळ उभे रहाता येत नसे आणि माझे पाय सतत दुखत असत. वर्ष २०१५ मध्ये अस्थीरोगतज्ञांनी मला सांगितले, ‘‘तुम्हाला सायटिकाचा (टीप) त्रास आहे आणि त्याचे शस्त्रकर्म करण्याविना पर्याय नाही.’’ (टीप : ‘कटीपासून (कंबरेपासून) पायाच्या मागील भागापर्यंत पसरणार्‍या वेदना) मी शस्त्रकर्म करून घेण्यासाठी सिद्ध नव्हते. मला अधिक त्रास झाल्यास आधुनिक वैद्य मला ‘स्टिरॉइड’ची २ इंजेक्शने देत असत. त्यामुळे जादू झाल्याप्रमाणे माझे दुखणे न्यून होत असे. ‘सायटिका’चा त्रास दूर होण्‍यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये दिलेल्‍या लेखातील ‘श्री दुर्गादेव्‍यै नमः । ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप मी प्रतिदिन १ घंटा १ मास केला. त्यानंतर मला एक वर्ष त्रास झाला नाही. वर्ष २०२३ मध्ये मला पुन्हा सायटिकाचा त्रास चालू झाला. तेव्हा मी पुन्हा ‘सायटिका’चा त्रास दूर होण्‍यासाठी सांगितलेला नामजप चालू केला. आता माझा त्रास ९५ टक्के इतक्या प्रमाणात न्यून झाला आहे.

२. त्वचेवर लहान फोड येणे आणि कंड सुटणे

(पू.) श्रीमती माया गोखले

२ अ. औषधोपचार केल्यावर त्रास दूर होणे आणि औषधोपचार थांबल्यावर पुन्हा त्रास होणे : २.९.२०२३ या दिवशी माझ्या पायाच्या घोट्याजवळ मोहरीएवढे बारीक ४ – ५ फोड आले. त्या आधी तेथे पुष्कळ कंड सुटत होती. मी कितीही खाजवले, तरी कंड थांबत नव्हती. मी तेथे खाजवल्यावर लहान फोडावरची कातडी निघत असे आणि नंतर तेथे खपली धरत असे. तेव्हा मला वाटले, ‘किडा किंवा माशी चावली असेल. त्यामुळे कंड सुटत आहे.’ ते बरे झाल्यावर माझ्या गुडघ्याला लहान ४ – ५ फोड आले. मला तेथेही पुष्कळ कंड सुटत असे आणि मी कितीही खाजवले, तरी कंड थांबत नसे. मी आधुनिक वैद्यांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी ५ दिवसांची औषधे दिली आणि तेथे तेल लावायला सांगितले. तेव्हा मला थोडे बरे वाटले; पण काही दिवसांनी मला पायापासून डोक्यापर्यंत सर्वत्र कंड येऊ लागली. मी पुन्हा आधुनिक वैद्यांकडून औषधे घेतली. तेव्हा मला थोडे बरे वाटू लागले; मात्र काही दिवसांनी मला पुन्हा त्रास होऊ लागला.

२ आ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने झालेले लाभ : मला होणारा त्रास दूर होण्यासाठी सद्गुरु गाडगीळकाकांनी मला ‘महाशून्य’ हा नामजप २ घंटे करायला सांगितला. त्यांनी मला सांगितले, ‘‘तुमच्यावर (त्रासदायक शक्तींचे) आवरण आले आहे. तुम्ही सतत आवरण काढा.’’ मी त्याप्रमाणे केल्यानंतर माझा त्रास ९५ टक्के इतक्या प्रमाणात न्यून झाला आहे. मी खाजवल्यामुळे मला झालेल्या जखमा आणि फोडही बरे झाले आहेत. मला ‘मधुमेहाचा आजार असल्याने जखमाचिघळतील’, अशी भीती वाटत असे; मात्र माझ्या जखमा बर्‍या झाल्या.

३. कृतज्ञता

‘सच्चिदानंद प.पू. गुरुदेव आणि सद्गुरु गाडगीळकाका यांची माझ्यावर कृपा झाली’, त्याबद्दल मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ‘प.पू. गुरुदेवांनी माझ्याकडून लिहून घेतले’, त्याबद्दलही मी कृतज्ञ आहे.’

– पू. (श्रीमती) माया गजानन गोखले (सनातनच्या ८१ व्या संत, वय ७९ वर्षे), लांजा, रत्नागिरी. (२९.२.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक