महाराष्ट्रातील १५० पैकी ४० ट्रॉमा केअर सेंटर बंद असल्याचे ‘सुराज्य अभियाना’च्या माहिती अधिकारातून उघड !

रस्ते अपघातांमधील मृत्यूच्या प्रमाणात घट होण्यासाठी चालू केलेले ‘ट्रॉमा केअर सेंटर’ दुर्लक्षित !

मुंबई – रस्ते अपघातांच्या वेळी रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, जेणेकरून अपघातग्रस्तांच्या मृत्यूंचे प्रमाण अल्प व्हावे, यासाठी राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर १५० ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत मात्र यांतील ४० ट्रॅामा केअर सेंटर बंद आहेत. हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाचे समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांना माहिती अधिकाराच्या अंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीमधून राज्यातील ट्रॉमा केअर सेंटरची केविलवाणी स्थिती उघड झाली आहे.

माहिती अधिकाराच्या अंतर्गत प्राप्त झालेली माहिती

कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, रायगड, नंदुरबार, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील प्रत्येकी १ ट्रॉमा केअर सेंटर बंद आहे. अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, धाराशिव, अहिल्यानगर, धुळे या जिल्ह्यांतील प्रत्येकी २ ट्रॉमा केअर सेंटर बंद आहेत. या व्यतिरिक्त पालघर, पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यांतील प्रत्येकी ३ आणि नाशिक येथील ५ ट्रॉमा केअर सेंटर बंद आहेत.

ट्रॉमा केअर सेंटरची आवश्यकता !

वर्ष २०२२ मध्ये महाराष्ट्रात एकूण २४ सहस्र ५७६ अपघात झाले. त्यांमध्ये ११ सहस्र ३७२ जणांचा मृत्यू झाला. वर्ष २०२३ मध्ये एकूण २५ सहस्र १३९ अपघात झाले. यांमध्ये ११ सहस्र १४५ जणांचा मृत्यू झाला. वर्ष २०२१ मध्ये राज्यात २१ सहस्र २३३ अपघात झाले होते. त्यामुळे ९ सहस्र ८७७ जणांचा मृत्यू झाला होता. ही आकडेवारी पहाता मागील २ वर्षांत राज्यातील अपघातांचे प्रमाण आणि त्यामध्ये होणार्‍या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. ही आकडेवारी पहाता महाराष्ट्रात ट्रॉमा केअर सेंटरची आवश्यकता आहे.

काय आहे ट्रॉमा केअर सेंटर ?

रस्ते अपघातामध्ये रुग्ण गंभीररित्या घायाळ होतात. अनेकदा अपघातमध्ये हाडे तुटतात. मेंदूला मार लागून मोठा रक्तस्राव होतो. अपघातग्रस्त व्यक्तीला वेळेत उपचार मिळणेही सर्वांत महत्त्वाचे असते; मात्र रुग्णालये दूर असल्यामुळे ते शक्य होत नाही. या सर्वांचा परिणाम व्यक्ती दगावण्यात होतो. रुग्णांना त्वरित आणि आधुनिक उपचार अपघातस्थळाजवळच मिळावेत, यासाठी ट्रॉमा केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये अपघातग्रस्त व्यक्तींना त्वरित उपचार मिळावेत, यासाठी अत्याधुनिक यंत्रणा, तज्ञ डॉक्टर यांची व्यवस्था असते. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत; मात्र अपघातग्रस्तांसाठी जीवनदायिनी असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरकडे प्रशासकीय यंत्रणेचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.