नवी मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादू नये ! – आमदार गणेश नाईक, भाजप

आमदार गणेश नाईक, भाजप

नवी मुंबई, १९ फेब्रुवारी (वार्ता.) – नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर येत्या काही दिवसांत २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये नवी मुंबईकरांवर कोणताही करवाढ नये, अशी सूचना भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गणेश नाईक यांनी या निवेदनात पुढील कामांसाठी निधीचे प्रावधान करण्यात यावे, असे म्हटले आहे. –

१. नवी मुंबईची भविष्यकालीन पाण्याची आवश्यकता भागवण्यासाठी ‘भिरा हायड्रो’ ही १ सहस्र एम्.एल्.डी. पाणी योजना हस्तांतरित करून घेणे

२. पालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी वाशी बस स्थानकाच्या धर्तीवर अन्य बस स्थानकांचा विकास करणे

३. ऐरोली-कटाई उन्नत मार्गावर ठाणे-बेलापूरच्या दिशेने चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिकांचे निर्माण करणे

४. शहरातील उर्वरित विभागामध्ये सार्वजनिक रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्र, माता बाल रुग्णालये यांच्या निर्मिती करणे

५. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश खरेदी करणे

६. अत्याधुनिक पद्धतीने घनकचर्‍याची व्यवस्था, कांडोनियम अंतर्गत कामे, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही योजना राबवणे, झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा

७. पॅरामेडिकल आणि परिचारिका महाविद्यालय, महिला बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी केंद्रांची उभारणी, नाका कामगारांसाठी निवारा, बेघरांसाठी रात्र निवारा केंद्र, इलेक्ट्रिक बसेस, हायड्रोजन फ्युएल बसेस खरेदी करणे