Shiv Janmotsav at Shivneri : छत्रपती शिवाजी महाराजांचा गडदुर्गांचा ठेवा जपणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

शिवनेरी गडावर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांचे गडदुर्ग म्हणजे आपला ठेवा असून तो जपण्याचा नक्की प्रयत्न करू. पहिल्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित २० पर्यटन स्थळे विकसित होत आहेत. त्यात रायगडाप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिवनेरी गडावर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,…

१. छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तूकला, अभियांत्रिकी, गडावरील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना समवेत घेऊन काम केले.

२. ते युगपुरुष, युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते. अठरापगड जातीचे, धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले.

३. त्यांनी प्रजेच्या दुःखापुढे, कल्याणापुढे स्वतःचे दुःख, आराम कवडीमोल मानला. त्यांनी तलवार हाती घेतली; पण निष्पापांच्या रक्ताने रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या तलवारीला रक्ताचा वास येत नाही, तर मानवतेचा सुगंध येतो. ते केवळ व्यक्ती नाही, तर विचार होते.

४. त्यांच्याकडील एक तरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास त्यांना हेच खरे अभिवादन ठरेल. त्यामुळे देश, राज्य, समाज आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू.

५. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडदुर्ग यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिफारस करणे ही अभिमानाची गोष्ट आहे.  जुन्नर हा पर्यटन तालुका असून बिबट सफारी विकसित करण्याचे घोषित केले आहे.

६. ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर कार्यक्रम घेतले आहेत. ‘जाणता राजा’ महानाट्याचे कार्यक्रम जिल्हावार घेत आहोत.

गडदुर्गांच्या विकासासाठी ए.एस्.आय.चे नियम शिथिल करण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक ! – देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील गडदुर्गांचे संवर्धन करतांना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून येणार्‍या अडचणींविषयी केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करून बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये पुरातत्व खात्याची प्रमाणित कार्यपद्धत सोपी करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. पद्धत सोपी झाल्यानंतर गडांच्या संवर्धनाच्या कामाला गती येईल.