महाराष्ट्रात वर्ष २०२२-२३ मध्ये १३ सहस्र ६५३ नवजात बालकांचा मृत्यू !

मुंबई – वर्ष २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रात १३ सहस्र ६५३ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीनुसार प्रत्येक दिवसाला ३१ बालकांचा, तर प्रत्येक ३९ व्या मिनिटाला एका नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकाराच्या अंतर्गत आरोग्य विभागाकडून ही माहिती प्राप्त झाली आहे.

अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अल्प आहे. महाराष्ट्रात वर्ष २०१९-२० मध्ये १४ सहस्र ६१४, वर्ष २०२०-२१ मध्ये १३ सहस्र ९५९, तर वर्ष २०२१-२२ मध्ये १४ सहस्र २९६ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीनुसार नागपूर, पुणे, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांत नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. याविषयी माहिती देतांना भारतीय वंध्यत्व सोसायटीच्या विदर्भ शाखेच्या प्रमुख डॉ. सुषमा देशमुख यांनी गर्भातच बाळाचा मृत्यू होण्याला विविध कारणे असू शकतात. गर्भाला योग्य रक्त आणि प्राणवायू यांचा पुरवठा न होणे, विविध संक्रमण, आरोग्य केंद्रापर्यंत पोचण्यास होणारा विलंब अशी नवजात बालकांच्या मृत्यूची विविध कारणे असू शकतात, असे म्हटले आहे.