(म्हणे) ‘भारत हा एक दुष्ट हिंदुत्ववादी आतंकवादी देश बनला असल्याचे स्वीकारा !’-बिलावल भुट्टो

पाकचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पाश्‍चात्त्य शक्तींना केले हास्यास्पद आवाहन !

बिलावल भुट्टो व खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर

इस्लामाबाद – खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या प्रकरणावरून भारत आणि कॅनडा यांच्यात संबंधात वाढलेल्या तणावावरून पाकच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी कमालीचे हास्यास्पद वक्तव्य केले आहे. ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’चे अध्यक्ष असलेले बिलावल भुट्टो यांनी भारताला ‘हिंदु आंतकवादी देश’ घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पाकच्या परराष्ट्र कार्यालयाला यावर अधिकृत वक्तव्य जारी करण्याचा आग्रह धरला आहे.

भुट्टो म्हणाले की, कॅनडाने भारतावर केलेल्या आरोपामुळे भारताचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय, विशेषकरून पश्‍चिमेतील पाकचे मित्र आणखी किती काळ भारताशी संबंधित अशा घटनांकडे दुर्लक्ष करणार आहेत ?  आंतरराष्ट्रीय समुदायावर हे स्वीकारण्याची वेळ आली आहे की, भारत हा एक दुष्ट हिंदुत्ववादी आतंकवादी देश बनला आहे.

काश्मीरवरूनही गरळओक !

काश्मीरसंदर्भात जुनाच राग आळवत भुट्टो म्हणाले की, भारताने काश्मीरमध्ये आतंकवाद पोसला. पाकमधील आतंकवादी आक्रमणांमध्ये भारतीय हेर सहभागी होत असतात. त्यांच्यापैकी अनेकांना अटक करण्यात आली आहे. (निराधार नि धादांत खोटे आरोप करणे हे भुट्टो यांच्या रक्तातच आहे ! – संपादक) आज भारताने ‘नाटो’चा सदस्य देश असलेल्या कॅनडाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले आहे. हे आंतरराष्ट्रीय कायदा आणि मापदंड यांचे उल्लंघन आहे. (भारतात पाकपुरस्कृत आतंकवादी घुसवतांना भुट्टो यांना आंतरराष्ट्रीय कायदे आठवत नाहीत का ? – संपादक)

 

संपादकीय भूमिका

भारताच्या दुष्टतेवर वक्तव्य करण्यापेक्षा भुट्टो यांनी त्यांच्या देशाच्या उरल्यासुरल्या अब्रूच्या रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! ही साधी गोष्टही न कळण्यासारखी व्यक्ती त्या देशाची एकेकाळी परराष्ट्रमंत्री होती, यातच सर्वकाही आले !