वर्ष २०३० पर्यंत आर्क्टिक महासागरातील हिमनद्या नष्ट होण्याची शक्यता !

  • जागतिक तापमानवाढीचा परिणाम !

  • प्रत्येक १० वर्षांनी वितळत आहे तब्बल १२.६ टक्के बर्फ !

बॉस्टन (अमेरिका) – जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणाम गेल्या काही वर्षांत संपूर्ण जग अनुभवत असून आर्क्टिक महासागरावरही त्याचा विपरीत परिणाम पहायला मिळत आहे. या महासागरातील हिमनद्या वितळल्यानेच अनेक देशांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. एका अहवालानुसार, प्रत्येक १० वर्षांनी आर्क्टिक महासागरातील तब्बल १२.६ टक्के बर्फ वितळत आहे. आर्क्टिक महासागरातील हिमनद्या वर्ष २०३० पर्यंत अदृश्य होण्याची भीतीही शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. याचा अर्थ उन्हाळ्यात येथे बर्फच दिसणार नाही. आर्क्टिकचे तापमान इतर जगाच्या तुलनेत चार पटींनी वाढत आहे.

१. गेल्या ४० वर्षांत उन्हाळ्यानंतर येथे शिल्लक राहिलेला बहुस्तरीय बर्फ ७० लाख चौरस किमीवरून केवळ ४० लाख चौरस किमी इतकाच राहिला आहे.

२. जागतिक तापमानवाढीचे सरासरी प्रमाण १.५ अंश असतांना आर्क्टिकमध्ये हे तापमान ४ अंशांपर्यंत मोजले गेले आहे.

३. उत्तर अटलांटिक महासागरातील पाण्याच्या पालटांचा आर्क्टिक महासागराच्या तापमानावर परिणाम होत असून याला ‘अटलांटिकीकरण’ (आर्क्टिक महासागराचे अटलांटिफिकेशन) असे नाव देण्यात आले आहे. यामुळेच वर्ष २००७ पासून आर्क्टिक महासागराचा बर्फ मोठ्या प्रमाणात वितळला आहे. याचा परिणाम भारतीय मौसमी पावसावरही झाला आहे.

४. संशोधकांचे म्हणणे आहे की, हिमनद्या किती वेगाने पालटत आहेत, यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. याचे कारण असे की, लाखो लोक पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी त्यांच्यावर अवलंबून आहेत.

५. संशोधनानुसार आर्क्टिकमधील स्वालबार्ड आणि रशियातील बॅरेंट्स आणि कारा समुद्राजवळील हिमनद्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे वितळल्या आहेत.

भारतात वादळी पाऊस, पूर आणि ढगफुटी यांसारख्या आपत्ती वाढण्याची शक्यता !

१. भारतीय उपखंडातील प्रदेश हे सतत वादळी पाऊस, पूर आणि ढग फुटणे यांसारख्या आपत्तींना तोंड देत आहेत. आगामी काळात या घटनांमध्ये आणखी वाढ होणार आहे.

२. भारतातील आर्द्रतेचे स्त्रोत दक्षिण आणि पश्‍चिम प्रदेश आहेत; पण काही वर्षांपासून आर्क्टिक ध्रुवावरूनही ओलावा भारतात येत आहे. आर्क्टिकचा बर्फ झपाट्याने वितळत असून हिमालयाच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे त्याचा ओलावा वाहून नेणारे वारे वेगाने वाहत आहेत. जेव्हा हे थंड वारे सखल भागातील उष्ण वार्‍यांशी आदळतात, तेव्हा वादळ निर्माण होते. त्यामुळे भारतात वादळी पाऊस आणि पूर यांची शक्यता वाढली आहे. जंगलांचा र्‍हास होत आहे. पावसामुळे भूमी वाहून जात असून नद्या तुडुंब भरत आहेत. त्यामुळे थोड्याशा पावसाचेही पुरात रूपांतर होत आहे.

संपादकीय भूमिका

धर्मविहीन वैज्ञानिक प्रगतीचाच हा परिपाक हे लक्षात घ्या !