चंद्र आणि सूर्य मोहिमेनंतर भारत आता समुद्रात पाठवणार ‘समुद्रयान’ !

नवी देहली – चंद्र आणि सूर्य मोहीम राबवल्यानंतर आता भारत समुद्र मोहीम राबवणार आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे मंत्री किरेन रिजिजू यांनी ११ सप्टेंबरला ट्वीट करून ही माहिती दिली. यासाठी चेन्नईच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नोलॉजी’मध्ये ‘समुद्रयान’ बनवण्यात येत आहे. या समुद्रयानचे नाव ‘मत्स्य ६०००’ ठेवण्यात आले आहे.

या यानाचा व्यास २.१ मीटर आहे. हे १२ घंट्यांसाठी ३ व्यक्तींना समुद्राच्या ६ सहस्र मीटर खोलीपर्यंत घेऊन जाऊ शकते, जेणेकरून तेथील स्रोत आणि जैव विविधता यांचा अभ्यास करता येईल. ही मोहीम वर्ष २०२६ पर्यंत कार्यान्वित होऊ शकते. यासाठी जवळपास ४ सहस्र १०० कोटी रुपये खर्च येणार आहे. समुद्रयानाच्या यशस्वीनंतर भारत अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान आणि चीन या देशांच्या सूचीमध्ये सहभागी होईल. या देशांकडे अशा मोहिमेसाठी विशेष तंत्रज्ञान आणि वाहन उपलब्ध आहेत.

१. रिजिजू यांनी म्हटले की, या प्रकल्पामुळे समुद्राची कोणतीही हानी होणार नाही. समुद्रातील खोलीत काय दडले आहे ?, हे शोधले जाणार आहे. यातून अनेकांना रोजगार मिळेल.

२. समुद्रयानाचे उद्देश समुद्राच्या खोलीचा शोध आणि दुर्मिळ खनिजांचे उत्खनन करण्यासाठी पाणबुडीच्या माध्यमातून व्यक्तीला पाठवणे, हे आहे. सामान्यत: पाणबुडी केवळ ३०० ते ४०० मीटर पर्यंत जाते. समुद्रयान समुद्रातील खोलीत गॅस, कोबाल्ट क्रस्टसारख्या संसाधनांचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात येत आहे. या सर्व गोष्टी समुद्राच्या १ सहस्र ते ५ सहस्र ५०० मीटर खोलीत सापडतात.