रत्नागिरीत ९ जणांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव : प्रांताधिकार्‍यांसमोर होणार सुनावणी

अमली पदार्थ विक्रीला रोखण्यासाठी पोलिसांची उपाययोजना !

रत्नागिरी – शहरातील काही भागांत अमली पदार्थ सापडत असून अंतर्गंत वादांमुळे परिसरातील वातावरण कलुषित होत आहे. या अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना म्हणून शहरातील ९ जणांच्या विरोधात हद्दपारीचे प्रस्ताव प्रातांधिकार्‍यांकडे पाठवले असून या प्रस्तावांवर लवकरच सुनावणी होणार आहे.

शहर आणि परिसरातील काही भागांमध्ये मागील मासांत छोट्या-मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी अमली पदार्थ पोलिसांनी घातलेल्या धाडीत सापडले होते. या वेळी पोलिसांनी शोधमोहीम घेऊन अनेकांना कह्यात घेतले. त्यामुळे अमली पदार्थांची होत असलेली विक्री न्यून करण्यात पोलीसयंत्रणेला थोड्या प्रमाणात यश मिळाले आहे.


अमली पदार्थांच्या विक्री करणार्‍या काही जणांच्या विरोधात त्यांच्यावरील पूर्वीचे गुन्हे लक्षात घेऊन त्यांचे हद्दपारीचे प्रस्ताव सिद्ध करण्यात आले. शहरात काही नागरिकांवर आपापसांत वाद घडवून आणल्याचे गुन्हेही नोंद असून त्यात काही महिलांचाही समावेश आहे. मारामारीचे गुन्हेही नोंद असून अशा लोकांमुळे शहरातील सामंजस्याचे वातावरण कलुषित होत आहे. यासाठी पोलिसांनी अशा गुन्हेगारांविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला आहे.

रत्नागिरी तालुक्यात रिहाना उपाख्य रेहाना उपाख्य रिजवाना गफार पकाली, ओंकार मोरे, हेमंत भास्कर पाटील, सरफराज उपाख्य बॉक्सर अहमद शहा, स्वप्नील बाळू पाचकडे, सलमान नाझीम पावसकर, फहीम अहमद नूर महमंद खडकवाले, अमिर मुजावर आणि अमेय राजेंद्र मसुरकर या ९ जणांचा समावेश आहे. यांतील काही जण अमलीपदार्थांची विक्री करण्यात गुंतले आहेत. त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई झाल्यास अमलीपदार्थ विक्रीला पायबंद बसेल, असे पोलिसांचे मत आहे.

संपादकीय भूमिका

  • अशा गुन्हेगारांची हद्दपारी करणे, म्हणजे त्यांना दुसरीकडे तोच गुन्हा करण्यास दिलेली मोकळीक !
  • खरेतर अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली, तरच असे गुन्हे करण्याचे धाडस अन्य कुणी करणार नाही, यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे अपेक्षित !
  • ब्रिटिशांच्या काळातील असे कायदे आता पालटणेच आवश्यक !