चिपळूण येथे मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले

मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था !

रत्नागिरी – १६ ऑगस्ट या दिवशी पनवेल येथे मनसेचा ‘निर्धार मेळावा’ झाला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणवासियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेविषयीचा प्रश्न उचलून धरला होता. मागील १० वर्षांत या मार्गावर २ सहस्र ५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. या रस्त्याच्या बांधकामावर आजपर्यंत साडेपंधरा सहस्र कोटी रुपये व्यय झाले आहेत, तरीही या महामार्गाचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे या महामार्गाच्या पूर्ततेसाठी आंदोलन करण्याची चेतावणीही ठाकरे यांनी निर्धार मेळाव्यात दिली होती. मनसे सैनिकांना दिलेल्या आदेशानुसार १८ ऑगस्ट या दिवशी मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण शहरातील बहादुरशेख नाका येथेही आंदोलन करण्यात आले.

या वेळी मनसेचे चिपळूण तालुकाध्यक्ष श्री. विश्वनाथ डोळस, मनसे चिपळूण शहर अध्यक्ष श्री. अभिनव भुरण, विभाग अध्यक्ष श्री. सुदेश फके, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष सागर कदम, सचिव श्री. सोहम पाथरे आणि अनेक मनसे सैनिक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. या आंदोलनात मनसे सैनिकांनी विविध घोषणा दिल्या. आंदोलनात सहभागी झालेले मनसेचे पदाधिकारी आणि मनसे सैनिक यांना चिपळूण पोलिसांनी कह्यात घेतले.

सरकारला जाग आणण्यासाठीच आंदोलन ! – अभिनव भुरण, शहर अध्यक्ष, मनसे

शहर अध्यक्ष श्री. अभिनव भुरण म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही. सरकार आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. या आंदोलनातून आम्ही प्रशासनाला नक्कीच जाग आणू आणि येत्या वर्षभरात या महामार्गाचे काम पूर्ण करून घेऊ.

राजापूर हातिवले टोलनाक्याची तोडफोड

राजापूर हातिवले टोलनाक्यावर अज्ञातांनी तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी मनसेचे राजापूर तालुका अध्यक्ष पंकज पंगेरकर आणि उपतालुका अध्यक्ष जयेंद्र कोठारकर यांना कह्यात घेतले. दुसरीकडे पाली येथील ‘हॅन इन्फ्रास्ट्रक्चर’ आस्थापनाचे कार्यालयही मनसे कार्यकर्त्यांनी फोडले आहे.

संपादकीय भूमिका

मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्ततेसाठी पुन:पुन्हा आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद  !