हरियाणामध्ये ५० गावांमध्ये मुसलमान व्यापार्‍यांना प्रवेशबंदी !

नूंह (हरियाणा) येथील हिंसाचाराचे प्रकरण !

नूंह (हरियाणा) – येथे दंगल झाल्यानंतर आजूबाजूच्या गावांतील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक गावांतील हिंदू हे सुरक्षित रहावेत, यासाठी उपाययोजना काढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील रेवाडी, महेंद्रगड आणि झज्जर या ३ जिल्ह्यांतील ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी पत्रे जारी करून मुसलमान व्यापार्‍यांना गावात प्रवेशबंदी घोषित केली आहे. पंचायतींच्या सरपंचांच्या स्वाक्षर्‍या असलेल्या या पत्रांमध्ये गावात रहाणार्‍या मुसलमानांनी त्यांची ओळखपत्रे पोलिसांना दाखवून घ्यावीत, अशी सूचनाही देण्यात आली आहे. नूंह येथील दंगलीनंतर मुसलमानांवर बहिष्कार टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी १४ गावांनी मुसलमान व्यापार्‍यांवर प्रवेशबंदी केली होती. आता हा आकडा वाढून ५० वर पोचला आहे.

१. महेंद्रगडचे उपविभागीय दंडाधिकारी मनोज कुमार यांनी सांगितले, ‘मला कुठल्याही ग्रामपंचायतींकडून प्रत्यक्ष पत्र प्राप्त झाले नसले, तरी सामाजिक माध्यमांवर ती प्रसारित झाली आहेत. ‘असे आदेश काढणे कायद्याच्या विरोधात आहे’, असे मनोज कुमार म्हणाले. (हिंदूंचे रक्षण करण्यास अपयशी ठरलेल्या प्रशासनाला हिंदूंनी टोकाचे पाऊल उचलल्यावर कायदा आठवतो, हे लक्षात घ्या ! – संपादक)

२. महेंद्रगडमधील सैदपूरचे सरपंच विकास यांनी सांगितले, नूंह येथील हिंसाचारामुळे असा निर्णय घ्यावा लागला. मागील मासामध्ये गावात चोरीच्या अनेक घटना घडल्या होते. हेही एक (बहिष्कार टाकण्यामागे) कारण आहे.’

संपादकीय भूमिका

हिंदु समाज हा सहिष्णु आहे. तो बहिष्कारासारखे टोकाचे पाऊल का उचलत आहे, हे जाणून त्याला आश्‍वस्त करण्याचे काम सरकार करणार का ?