मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला उर्दू भाषेत धमकीचा संदेश !

मुंबई – मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाच्या दूरभाष क्रमांकावर उर्दू भाषेतून धमकीचा संदेश आला. विदेशातील क्रमांकावरून हा संदेश पाठवण्यात आला. ‘सीमा हैदर परत आली नाही, तर भारताचा नाश’, असा त्यात उल्लेख असून या संपूर्ण कृत्याला उत्तरप्रदेश सरकार उत्तरदायी असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी भारतातील एका तरुणाच्या प्रेमात पडलेली एक पाकिस्तानी महिला तिच्या मुलांसह भारतात पळून आली होती. या पार्श्‍वभूमीवर ही धमकी देण्यात आली आहे.

संदेशात २६ नोव्हेंबर २००९ या दिवशी मुंबईवर करण्यात आलेल्या आतंकवादी आक्रमणाचाही उल्लेख करण्यात आला आहे. याविषयी गुन्हे शाखेला कळवण्यात आले आहे. प्राथमिक पहाणीत संदेश पाठवणार्‍याने खोडसाळपणा केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे; परंतु असे असले, तरी या संदेशामुळे सर्व यंत्रण सतर्क झाल्या आहेत.

नोव्हेंबर २०२२ मध्ये मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरून धमकीचा संदेश आला होता. त्या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.