३० मिनिटांच्या नमाजपठणामुळे कोणतीही हानी होत नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

मद्रास उच्च न्यायालयाने एका मंदिराच्या मार्गावरील नमाजपठणावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली !

(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ)

मद्रास उच्च न्यायालय

चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने राज्यातील मदुराई जिल्ह्यातील   थिरुप्पारनकुंद्रम् पर्वताजवळील काशी विश्‍वंथर मंदिराकडे जाणार्‍या नेल्लीथोप्पू या मार्गावर होणारे नमाजपठण बंद करण्याचा आदेश देण्यास नकार दिला आहे. ‘३० मिनिटांपर्यंत होणार्‍या नमाजपठणामुळे कोणतीही हानी होत नाही, तसेच कोणत्याही व्यक्तीवर त्याचा परिणाम होत नाही’, अशी न्यायालयाने या वेळी टिप्पणी केली. या वेळी न्यायालयाने राज्याच्या ‘हिंदु धार्मिक  आणि धर्मार्थ बंदोबस्त’ विभागाला या संदर्भात पुढील ४ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे.

‘अखिल भारत हनुमान सेने’चे राज्य सचिव रामलिंगम् यांनी ही याचिका प्रविष्ट केली होती. रामलिंगम् यांनी या याचिकेत म्हटले आहे की, जे भक्त थिरुप्परकुंद्रम् येथील काशी विश्‍वंथर मंदिरात प्रार्थनेसाठी जातात ते नेल्लीथोप्पू येथे विश्रांती घेतात, भोजन करतात. त्याच वेळी सिकंदर बधुशा धारगा जमातीचे सदस्य येथे नमाजपठण करतात. हे सदस्य एरव्ही पल्लीवासल मशिदीमध्ये नमाजपठण करतात. यापूर्वी त्यांनी नेल्लीथोप्पू येथे कधी नमाजपठण केले नव्हते. त्यांना नमाजपठणासाठी येथे अन्य भूमीही उपलब्ध आहे. हे सदस्य लोकांसाठी उपद्रव निर्माण करत आहेत. नमाजपठण केल्यानंतर ते प्लास्टिकचा कचराही तेथे टाकतात. त्यामुळे येथे प्रदूषणही झाले आहे. जमातचे सदस्य दावा करतात की,  थिरुप्परकुंद्रम् येथील अरुलमिघू सुब्रह्मण्यम स्वामी थिरुकोईल पर्वताला ते ‘सिकंदर पर्वत’ मानतात. त्याद्वारे ते येथील भूमीवर अतिक्रमण करून कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, असेच भाविकांना वाटेल !
  • हिंदूंच्या मंदिराच्या मार्गावर कुणी जाणीवपूर्वक नमाजपठण करत आहे का ? याची चौकशी राज्यातील नास्तिकतावादी द्रमुक सरकार करणार नाही, हेही तितकेच खरे ! या उलट हिंदूंनी अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळाच्या मार्गावर धार्मिक मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला, तर पोलीस त्याला अनुमती नाकारतात, हे लक्षात घ्या !