भारताचे सडेतोड परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर !

बांगलादेशची राजधानी ढाका येथे मे मासात ६ वी ‘इंडियन ओशियन कॉन्‍फरन्‍स’ म्‍हणजेच ‘हिंद महासागर परिषद’ पार पडली. या वेळी भारताचे परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर हेही उपस्‍थित होते. डॉ. जयशंकर यांनी चीनसह पाकिस्‍तानला चांगलेच धारेवर धरले. चीनवर अप्रत्‍यक्ष आक्रमण चढवत डॉ. एस्. जयशंकर यांनी सांगितले, ‘जेव्‍हा एखादे राष्‍ट्र कायदेशीर दायित्‍वांकडे दुर्लक्ष करते किंवा दीर्घकालीन सहकार्य करारांचे उल्लंघन करते, तेव्‍हा विश्‍वास न्‍यून होत जातो. त्‍याचप्रमाणे दोन्‍ही राष्‍ट्रांना मोठ्या प्रमाणावर गंभीर हानी सहन करावी लागते.’’ हिंद महासागर क्षेत्रातील महत्त्वाची सामायिक चिंता म्‍हणजे गैर-व्‍यवहार्य प्रकल्‍पांमुळे निर्माण होणारे कर्ज. त्‍यामुळे स्‍थिर आंतरराष्‍ट्रीय सुव्‍यवस्‍था निर्माण करण्‍यासाठी कायदा आणि नियम यांचे काटेकोरपणे पालन करणे अन् नियमांचा आदर करणे याला एक वेगळे महत्त्व आहे.

डॉ. जयशंकर यांनी चीनला धारेवर धरत सीमा कराराचे उल्लंघन केल्‍याचे म्‍हटले. कराराचे उल्लंघन केल्‍याने दोन्‍ही देशांतील तणाव वाढत असल्‍याचे सांगत जयशंकर यांनी सीमा कराराचे उल्लंघन करणार्‍या पूर्व लडाखमधील वास्‍तविक नियंत्रणरेषेवर (‘एल्.ए.सी.’वर) चीनकडून मोठ्या संख्‍येने सैन्‍य तैनात करण्‍यासह चीनच्‍या आक्रमक वर्तनावरही टीका केली.

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

१. भारताचा ‘चीन-पाकिस्‍तान इकॉनॉमिक कॉरिडोर’ला (सुसज्‍ज महामार्गाला) तीव्र विरोध

गेल्‍या २ दशकांतील काही धडे असे आहेत की, ज्‍याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. जर आपण अशा अपारदर्शक कर्ज आणि महागड्या प्रकल्‍पांना प्रोत्‍साहन दिले, तर भविष्‍यात याचे परिणाम भोगावे लागतील. सुरळीत आणि प्रभावी दळणवळण यंत्रणेचे (‘कनेक्‍टिव्‍हिटी’चे) महत्त्वही डॉ. जयशंकर यांनी अधोरेखित केले. सर्वांनी प्रत्‍येक देशाचे सार्वभौमत्‍व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे आवश्‍यक असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. विशेष म्‍हणजे पाकिस्‍तानच्‍या बलुचिस्‍तान प्रांतातील ग्‍वादर बंदरातून चीनला अरबी समुद्रात प्रवेश देऊन पाकव्‍याप्‍त काश्‍मीरमधून

जात असलेल्‍या ६० अब्‍ज डॉलरच्‍या (४ लाख ९१ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) ‘चीन-पाकिस्‍तान इकॉनॉमिक कॉरिडोर’ला भारताचा तीव्र विरोध असल्‍याचेही त्‍यांनी ठणकावून सांगितले.

२. जागतिक पटलावर स्‍वतःची छाप पाडणारे डॉ. जयशंकर !

या परिषदेत मॉरिशसचे राष्‍ट्रपती पृथ्‍वीराजसिंह रूपन, मालदिवचे उपराष्‍ट्रपती फैसल नसीम यांसह जगभरातील अनेक देशांच्‍या मंत्र्यांनी सहभाग घेतला. या परिषदेत डॉ. जयशंकर यांनी चीनसह पाकिस्‍तानचेसुद्धा वाभाडे काढले. तत्‍पूर्वी बांगलादेश दौर्‍याच्‍या वेळी त्‍यांनी बांगलादेशच्‍या पंतप्रधान शेख हसीना यांच्‍याशी सहकार्य आणि एकमेकांचे हित या मुद्यांवर सविस्‍तर चर्चा केली. यानंतर नेपाळचे परराष्‍ट्रमंत्री एन्.पी. सऊद यांच्‍याशीही ऊर्जा आणि दळणवळण या विषयांवर डॉ. जयशंकर यांची बैठक पार पडली. सध्‍या परराष्‍ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांचा आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर चांगलाच दबदबा पहायला मिळत आहे. त्‍यांच्‍या सडेतोड बोलण्‍यामुळे ते आंतरराष्‍ट्रीय माध्‍यमांमध्‍येही चर्चेत असतात. डॉ. जयशंकर यांनी परराष्‍ट्रमंत्री म्‍हणून जागतिक पटलावर स्‍वतःची छाप सोडली आहे.

३. परिषदांमध्‍ये डॉ. जयशंकर यांनी पाक अन् चीन यांना खडेबोल सुनावणे

मे मासात गोवा येथे शांघाय सहकार्य परिषद पार पडली. बर्‍याच वर्षांनंतर पाकिस्‍तानचे मोठे नेते तथा परराष्‍ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी सहभाग घेतला. परिषदेच्‍या कालावधीतच काश्‍मीरच्‍या पुंछमध्‍ये आतंकवादी आक्रमण झाले. त्‍यामुळे एकीकडे चर्चा करायची आणि पाठीमागे आतंकवाद वाढवण्‍यासाठी प्रयत्न करायचा, ही पाकची नीती लपून राहिलेली नाही. डॉ. जयशंकर यांनीही भुट्टो यांच्‍याशी द्विपक्षीय चर्चेस नकार दिला. तसेच ‘वरवर स्‍वागत स्‍वीकारून माघारी फिरा’, अशीच नीती भुट्टो यांच्‍याशी वापरली. त्‍यामुळे ‘जो भारताकडे वाकड्या नजरेने पाहील, त्‍याला त्‍याच्‍याच भाषेत उत्तर मिळेल’, असा स्‍पष्‍ट संदेश या वेळी डॉ. जयशंकर यांनी दिला. त्‍यानंतर आता हिंद महासागर परिषदेतही डॉ. जयशंकर यांनी पाक आणि चीन यांना खडेबोल सुनावत भारताची बाजू भक्‍कमपणे मांडली आहे.

– श्री. पवन बोरस्‍ते

(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, १४.५.२०२३)