चीनकडून ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’च्या पत्रकाराचा व्हिसा वाढवून देण्यास नकार

  • चीनमध्ये आता एकही भारतीय पत्रकार नाही !

  • ‘भारतही चीनच्या पत्रकारांशी असाच वागवत असतो’, असा चीनचा आरोप !

(व्हिसा म्हणजे देशात ठराविक कालावधीपर्यंत रहाण्याची अनुमती)

बीजिंग (चीन) – चीनने भारताच्या एकमात्र पत्रकारालाही देश सोडण्याचा आदेश दिला आहे. हा पत्रकार ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या वृत्तसंस्थेचा आहे. चीनने त्याच्या चीनमधील वास्तव्याशी संबंधित कागदपत्रांचे नूतनीकरण केले नाही. यापूर्वी भारताच्या २ पत्रकारांचा व्हिसा वाढवून देण्यास चीनने नकार दिला होता. त्यामुळे दोघांनाही भारतात परतावे लागले होते. ‘भारतही आमच्या पत्रकारांना अशीच वागणूक देतो’, असा आरोप चीनकडून करण्यात आला आहे. भारतापूर्वी अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या पत्रकारांनाही चीनमध्ये अशीच वागणूक मिळाली आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असतांना त्यांनी चीनच्या या कृत्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते.

दोन्ही देशांच्या पत्रकारांविषयीच्या प्रकरणावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले की, अलीकडच्या काळात भारतात चिनी पत्रकारांना योग्य वागणूक दिली जात नाही. ते भेदभावाचा बळी होतात. असे असूनही आम्हाला आशा आहे की, भारत आमच्या पत्रकारांना व्हिसा देत राहील. आम्हाला आशा आहे की, भारतातील आमच्या पत्रकारांसाठी जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या अडचणी दूर होतील. दोन्ही देशांचे पत्रकार एकमेकांच्या देशात आरामात काम करू शकतील, अशी परिस्थिती निर्माण केली जाईल.

संपादकीय भूमिका

  • भारताने चीनच्या पत्रकारांशी काय चुकीची वागणूक दिली, हे त्याने प्रथम सांगावे. भारतात राहून चिनी नागरिक जर उद्यामपणे वागून भारतीय नियमांचे पालन करत नसतील, तर भारताने ते का सहन करावे ?
  • चीनमध्ये हुकूमशाही, हे जगाला ठाऊक असल्याने अशा घटना आश्‍चर्यजनक नाही !