सनातन विचार आणि त्‍याची सद्यःस्‍थिती

१. सनातन विचारप्रणालीवर सत्तेच्‍या दडपशाहीचा वरवंटा फिरवला जाणे

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘शास्‍त्र आहे, इथे कसला पक्षपात ? कसला जुलुम ? सनातन श्रद्धेसंदर्भातले चिंतन कुणीही छापत नाही. त्‍याचा आवाजच जात नाही. नव्‍हे तर सनातनी प्रणालीचे लेखन अजिबात प्रसिद्ध होऊच नये, ते दडपून टाकता आल्‍यास बरेच, अशा तर्‍हेची रानटी आणि मत्‍सरी विचार पद्धत आज सर्वत्र प्रचलित आहे. सनातन विचार प्रणालीवर सत्तेच्‍या दडपशाहीचा वरवंटा फिरवला जातो. ते खरे सार आहे. खरा जिवंतपणा आहे. त्‍यामुळेच ते अनेक प्रकारच्‍या दिव्‍यातून टिकेल. आज ना उद्या ते सर्व राष्‍ट्रास शिरोधार्ह वाटेलच.

२. सनातन धारणा शास्‍त्रीय दृष्‍टीकोनातून समजून न घेता ती दुराग्रह आणि हट्टाने नाकारणे महापातक असणे

आजच्‍या मूलभूत प्रश्‍नांची उत्तरे मिळण्‍याकरता मूळ सनातन धारणा काय आहे ? हे पहाणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. ती समजावून घेतली, तर आज हे जे आधुनिक मूल्‍यांचे मंथन चालू आहे, त्‍यातील ती वैगुण्‍ये दूर करता येतील. शुद्ध आणि शास्‍त्रीय दृष्‍टीकोन ठेवा. कोणत्‍याही दुराग्रहाच्‍या अधीन होऊ नका. प्रत्‍येक समस्‍येविषयी सनातनी हिंदूंची धारणा काय आहे ? ते पहा. समजून घ्‍या. केवळ शास्‍त्रदृष्‍टी बाळगून आमच्‍या सनातन परंपरांचा अभ्‍यास करा. यथार्थज्ञान लोकांसमोर ठेवा. दुराग्रह आणि हट्टाने नाकारणे, हे महापातकी अन् मोहग्रस्‍त पाश्‍चात्त्यांच्‍या तोंडी शोभून दिसते; परंतु ज्‍या हिंदूने मातेच्‍या दुधासमवेत सनातन धर्माचे पान (ग्रहण) केले आहे, त्‍या हिंदूंच्‍या ओठाला त्‍यांचा (दुराग्रह आणि हट्टाने नाकारणे) स्‍पर्श, हे अत्‍यंत शोचनीय आहे.

३. इंग्रजी शिक्षणाने सनातन धर्म आणि संस्‍कृती यांना नष्‍ट करणे

रानटी इंग्रजी शिक्षणाने परिणामकारकरित्‍या सनातन धर्म आणि संस्‍कृती यांविरोधात लावलेल्‍या विषवल्लीने आमच्‍या सनातन वृक्षाला सर्व बाजूंनी आच्‍छादले आहे. सत्तेकरता मतपेटी (व्‍होट बँक) करता आसुसलेल्‍या या दुष्‍ट यच्‍चयावत् राजकारण्‍यांनी आमचा भूतकाळ, सनातन धर्म आणि त्‍याची नाळच आमच्‍या पिढीपासून तोडून टाकली. आमची मंदिरे मुसलमानांनी फोडली. आमची अस्‍मिता सिंहासारखी होती. आम्‍ही पुन्‍हा नवीन मंदिरे बांधली. शास्‍त्रे कंठस्‍थ करून रक्षिली. इंग्रजांनी मंदिरे तोडली नाहीत. शास्‍त्रे जाळली नाहीत; पण इंग्रजी शिक्षण देऊन आम्‍हाला प्रज्ञाहीत (प्रज्ञा नष्‍ट) केले. त्‍यामुळे मंदिरात जाण्‍याची आमची श्रद्धाच नाहीशी झाली. आमचे श्रुति, स्‍मृति, पुराणादि प्राचीन विद्यावैभव आम्‍हाला तुच्‍छ वाटू लागले. पश्‍चिमेच्‍या वळणाला आम्‍ही लागलो आणि आज असे शिक्षणाचे भ्रष्‍ट पर्याय स्‍वीकारून पौरुषहीन आणि प्रज्ञाहीत झालो आहोत.’

– गुुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०२२)

‘जे मला कळत नाही, तो सर्व मूर्खपणा आहे, अशी हीनबुद्धी, हृदयदौर्बल्‍य घालवून शास्‍त्रनिष्‍ठा, विजिगीषु वृत्ती जोपासणे, हीच आमची भूमिका आहे.’ – गुुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी (साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०११)