अनिल देशमुख यांची मिरवणूक काढून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकीय संस्कृतीला काळीमा ! – भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते, भाजप

अनिल देशमुख यांची मिरवणूक : राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकीय संस्कृतीला काळीमा !

मुंबई – भ्रष्टाचारावर कठोर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधीमंडळात संमत करून घेत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कारावास भोगणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनमुक्तीचा सोहळा साजरा करत होते.

(सौजन्य : TV9 Marathi) 

भ्रष्टाचार्‍यांचे उदात्तीकरण करणार्‍या या संस्कृतीमुळे महाराष्ट्राची मान लाजेने खाली गेली आहे, अशी कठोर टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी २९ डिसेंबर या दिवशी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

केशव उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे की, देशमुख यांना प्रकृतीच्या कारणावरून याचना केल्यामुळे न्यायालयाने जामिनावर सोडले असतांना कारागृहाबाहेर येणार्‍या देशमुखांना स्वातंत्र्ययोद्धासारखा सन्मान देत त्यांची मिरवणूक काढणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचाराने बरबटलेला चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असतांना गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप झाला, तेव्हाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे सरकार त्यांना पाठीशी घालत होते. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येत असतांना त्यामध्ये गुंतलेल्यांची पाठराखण करत खुद्द उद्धव ठाकरे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत होते. गुंडगिरी, मारहाण, भ्रष्टाचार आणि खून असे आरोप असलेले मंत्री आणि अधिकारी यांच्या बचावासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लावली जात होती. तरीही अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत आदी नेत्यांना गजाआड जावेच लागले.