हलाल अर्थव्यवस्थेमुळे भारताला, तसेच हिंदूंना गंभीर धोका निर्माण झाला आहे ! –  रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

म्हापसा (गोवा) येथे ‘हिंदु-राष्ट्र’ संघटन बैठकीत ‘हलाल प्रमाणपत्र’ अनिवार्य केल्याने उद्भवणार्‍या समस्यांविषयी हिंदूंचे प्रबोधन !

श्री. रमेश शिंदे

म्हापसा (गोवा) – शरियतवर आधारित हलाल अर्थव्यवस्था आज चांगली होतांना दिसत आहे. पदार्थ, वस्तू आदींच्या विक्रीसाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ अनिवार्य केले जात आहे.  हलाल प्रमाणपत्र केवळ मांसापुरते मर्यादित न रहाता खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालय, गृहसंस्था, मॉल यांसाठीही चालू आहे. ‘सेक्युलर’ (निधर्मी) भारतात ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ आणि अन्न अन् औषध प्रशासन (एफ्.डी.ए.) या सरकारी संस्था असतांनाही इस्लामी धार्मिक संस्थांद्वारे देण्यात येणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ अनिवार्य करणे, हे एक आश्चर्य आहे. बाजारातून घरात येणार्‍या साखरेपासून ते पर्यटन क्षेत्र हलाल अर्थव्यवस्थेच्या विळख्यात गोवले गेले आहे. यामुळे भारताला, तसेच हिंदूंना गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मरड, म्हापसा येथील तुळशीराम सभागृहात आयोजित केलेल्या ‘हिंदु-राष्ट्र’ संघटन बैठकीत श्री. शिंदे मार्गदर्शन करत होते.

या बैठकीत हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. नागेश जोशी यांनी ‘हातकातरो खांबा’चे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या हेतूने करायच्या प्रयत्नांविषयी उपस्थितांना माहिती दिली, तसेच या कार्यात राष्ट्र अन् धर्म प्रेमी यांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांनी केले.


‘हातकातरो खांबा’चे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन

‘हातकातरो खांबा’च्या जतनाविषयी आवाहन करतांना श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘गोव्यावर पोर्तुगिजांनी लादलेल्या ‘इन्क्विझिशन’च्या छळात (धर्मच्छळात) निरपराध हिंदूंना, तसेच नवख्रिस्त्यांना शिक्षा देण्यासाठी वापरलेला जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ आज दुर्लक्षित आहे. गोमंतकीय जनतेच्या पूर्वजांनी इन्क्विझिशनच्या काळात भोगलेल्या छळाचा एकमात्र पुरावा असणार्‍या या खांबाकडे पुरातत्व खात्याकडून पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. ख्रिस्त्यांनी अनेक देशांमध्ये केलेल्या अत्याचारांविषयी त्यांचे धर्मगुरु पोप यांनी क्षमा मागितली आहे; मग गोमंतकियांवर लादलेल्या ‘इन्क्विझिशन’विषयी पोप क्षमा का मागत नाहीत ?’’

प्रत्येक हिंदूने जागृत होणे, ही काळाची आवश्यकता ! – रमेश शिंदे

भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्यामुळे प्रत्येकाला त्याच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे, तरीही बहुसंख्य हिंदूंवर हलाल व्यवस्था लादली जात आहे. याविषयी प्रत्येक हिंदूने जागृत होणे, ही काळाची आवश्यकता बनली आहे.