वर्धा जिल्ह्यात पावसामुळे १०० गावांचा संपर्क तुटला !

वर्धा – जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील १०० गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगणघाट तालुक्यात १७ जुलैच्या रात्रीपासून सर्वत्र ढगफुटीसदृश पावसामुळे २० गावांत पुराचे पाणी शिरले आहे.

शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट !

सहस्रो हेक्टर शेतभूमीत पीक पाण्याखाली गेल्याने शेतकर्‍यांची पुष्कळ प्रमाणात हानी झाली आहे. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाकडून एन्.डी.आर्.एफ्.च्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पावसामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

महाकालीनगर परिसरातील २० कुटुंबियांना घरात पाणी शिरल्याने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे, तर सेलू येथे बाभुळगाव पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत.