‘शरियत नसणार्‍या ठिकाणी मुसलमानांनी राहू नये’, असे सांगणार्‍या शरियतचे भारतातील मुसलमानांनी पालन करावे !

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांची स्पष्टोक्ती !

केरळचे राज्यपाल आरिफ खान

नवी देहली – ‘शरियत’ हा शब्दच चुकीचा आहे. शरियत अल्लाच्या कायद्याला म्हणतात, जो निसर्गाचा कायदा आहे; मात्र आमच्या देशात हा कायदा लागू नाही. आमच्या येथे राज्यघटना आहे. शरियत असे म्हणते की, जेथे शरियत लागू नाही, तेथे मुसलमानांनी राहू नये. जर असे आहे, तर मुसलमानांनी शरियतचे पालन केले पाहिजे, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी ‘टाइम्स नाऊ नवभारत’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.

१. राज्यपाल खान पुढे म्हणाले की, उदयपूर येथील हत्याकांडामागील कारणांचाही विचार केला पाहिजे. आम्हाला याकडे लक्ष द्यायला हवे की, ‘हा आजार बरा कसा करता येईल ?’ ‘भारतात मुसलमान घाबरलेले आहेत’, असे म्हटले जाते. एखादा माथेफिरू एका व्यक्तीला त्याच्या दुकानात जाऊन धोका देऊन ठार करतो तो ‘घाबरलेला आहे’ असे म्हटले, तर जे घाबरलेले नाहीत, ते काय करू शकतात, याचा विचार केला पाहिजे.

२. नूपुर शर्मा यांच्या प्रकरणी मुसलमानांकडून ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद करणे) अशा प्रकारच्या शिक्षेची घोषणा करण्यात आली आहे. याविषयी राज्यपाल आरिफ महंमद खान म्हणाले की, धर्मामध्ये अध्यात्म एक महत्त्वाची गोष्ट आहे. अध्यात्म जीवनाचा आदर करते, शिरच्छेद करत नाही. अध्यात्म चुकीचे काम करणार्‍याविषयीही प्रेम राखते आणि त्याला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करते.

संपादकीय भूमिका

  • नेहमीच शरियत कायद्याची मागणी करणारे याविषयी बोलतील का ?
  • आरिफ महंमद खान नेहमीच इस्लाममधील ज्ञान आणि सध्याची मुसलमानांची वस्तूस्थिती उघड करत असतात; मात्र कुणी त्यांचा प्रतिवाद करण्याचे धाडस करत नाही, हे लक्षात घ्या !