कोरोना संसर्गाची तिसरी लाट टाळण्यासाठी योग्य वर्तन आवश्यक ! – डॉ. सुभाष साळुंखे, आरोग्य सल्लागार

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे

सांगली, १६ जुलै – कोरोना महामारीची तिसरी लाट येणार कि नाही हे संपूर्णत: आपल्यावरच अवलंबून आहे. कोरोनाचा संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी योग्य वर्तन ठेवल्यास आपण तिसरी लाट रोखू शकू अन्यथा तिसरी लाट सप्टेंबर-ऑक्टोबर मासात अटळ आहे. माणसाचा जीव वाचवणे हीच सर्वांची प्राथमिकता असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी कठोरपणे करा, असा सल्ला राज्याचे आरोग्य सल्लागार आणि माजी आरोग्य संचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी दिला.

राज्यात अनेक ठिकाणी रुग्णसंख्या अल्प होत असतांना सांगली जिल्ह्यात रुग्णसंख्या स्थिर आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूनही रुग्णसंख्या अल्प होत नाही. या अनुषंगाने कोरोना संसर्गाची पहाणी करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे हे सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन आणि संबंधित सर्व यंत्रणा यांची बैठक घेतली. त्या वेळी वरील सल्ला त्यांनी दिला.