हुतात्म्यांनी स्वतंत्र केलेल्या राष्ट्रात आपण हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे ! – सुमित सागवेकर

रत्नागिरी येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान

श्री. सुमित सागवेकर

रत्नागिरी – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्याला दिलेला संदेश खूप महत्त्वाचा आहे, ‘राष्ट्रात केवळ हुतात्मे नकोत, तर विजयी वीर हवेत !’ राष्ट्रात प्रसंगी हुतात्मे ही निपजप नाहीत, ते राष्ट्र आधीच मेलेले असते. जे राष्ट्र केवळ हुतात्म्यांवर समाधान मानून विजयीवीर निर्माण करण्याकडे दुर्लक्ष करते, ते राष्ट्रही मृतप्राय रहाते. आमच्या पिढीने राष्ट्रास हुतात्म्यांच्या पायरीवर आणले, तुमच्या पिढीने आता वीर बनवून विजयाच्या पायरीवर म्हणजेच हिंदु राष्ट्र बनवले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्वतंत्र हिंदुस्थानकडून हे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले. समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीदिनानिमित्त नुकतेच ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी क्रांतीची प्रेरणा देणारी वीर सावरकर यांची वास्तू आणि राष्ट्रकार्यासाठी झटतांना त्यांनी वापरलेल्या वस्तू यांची छायाचित्रे दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नारायणी शहाणे आणि कु. प्राची शिंत्रे यांनी केले.

श्री. सुमित सागवेकर पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे अखंड हिंदुस्थानचे प्रणेते, मातृभाषेचा अभिमान आणि राष्ट्रीय अस्मिता असलेले, दूरदर्शी, प्रतिभासंपन्न क्रांतीवीर, साहित्यिक आणि क्रांतीकारकही अनेक होऊन गेले; मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखा क्रांतीवीर साहित्यिक हा ‘यासम हाच !’ त्यांनी मार्सेलिसच्या समुद्रात मारलेली जगप्रसिद्ध उडी असू दे किंवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ‘लेखण्या मोडा आणि बंदुका उचला’, असे केलेले आवाहन असू दे, यातून त्यांचे राष्ट्राप्रतीचे प्रगल्भ राष्ट्रप्रेम दिसून येते. ‘या सूर्यमंडळात हिंदूंसाठी एक देश असलाच पाहिजे आणि तेथे त्यांची भरभराट झालीच पाहिजे’, असे ठाम मत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे होते.

मनोगत

या व्याख्यानाच्या माध्यमातून सावरकर यांना आमच्या समोर उभे केले. सावरकर आमच्या समोर वावरत आहेत कि काय, असे वाटत होते. त्यांच्या यातना आम्हाला कळल्या. सावरकर यांचे अवघे जीवन संघर्षमय कसे होते ? ते सविस्तर कळले. – कु. माधवी पांचाळ, कु. मिथिला वाडेकर, कु. वैदेही खडसे आणि कु. सुवर्णा सकपाळ