पू. राधा प्रभु यांनी बालसंत पू. भार्गवराम यांना राजण्णा (चालक) आणि त्यांची बैलगाडी यांच्याविषयी गोष्ट सांगणे

पू. राधा प्रभु

‘पू. राधाआजी (पू. राधा प्रभु) पू. भार्गवराम यांना विविध चित्रे आणि गोष्टी यांच्या माध्यमातून शिकवत आहेत. त्यांची पू. भार्गवराम यांच्यावर योग्य संस्कार होण्यासाठी त्यांना साधना शिकवण्याची तळमळ पाहून भावजागृती होते. एकदा पू. राधाआजींनी पू. भार्गवराम यांना राजण्णा (चालक) आणि त्यांची बैलगाडी यांच्याविषयी सांगितले.

पू. भार्गवराम प्रभु

१ अ. पू. राधा प्रभु यांनी पू. भार्गवराम यांना रामनाथी आश्रमाच्या महानतेविषयी सांगणे

पू. भार्गवराम : पणजीआजी, ही बैलगाडी कुठून आली ? कुठे जाणार आहे ?

पू. राधा प्रभु : ती कर्नाटकातील कोणत्यातरी गावातून आली आहे. ती मंगळुरू येथे जाणार आहे.

पू. भार्गवराम : का ? तिथे विशेष काय आहे ?

पू. राधा प्रभु  : मंगळुरू येथे साधक सेवा करतात ते ठिकाण भगवान विष्णूच्या वैकुंठासारखे आहे.

पू. भार्गवराम : तसे असेल, तर खरे वैकुंठ कुठे आहे ?

पू. राधा प्रभु : ते गोवा राज्यातील रामनाथी येथे आहे. तेथे भगवान विष्णु मनुष्य अवतार धारण करून प्रमुख देवतांसह रहात आहेत.

१ आ. पू. राधा प्रभु यांनी पू. भार्गवराम यांना सनातनचे साधक करत असलेल्या सेवांविषयी सांगणे

पू. भार्गवराम : मंगळुरू येथे कोण आहेत ?

पू. राधा प्रभु : मंगळुरू येथे संत आणि साधक आहेत. तेथे एक बालसंत आहेत. त्यांचे वय आता २ वर्षे ६ मास आहे. ते नुकतेच बोलायला शिकले आहेत. ‘त्यांना पहावे, त्यांच्याशी बोलावे आणि त्यांची सेवा करावी’, या इच्छेने राजण्णांच्या गाडीचे बैल उत्सुक आहेत. त्यासाठी राजण्णांनी त्या बैलांना आपल्या गाडीला बांधून आणले आहे. त्यांची गाडी अर्ध्या घंट्यात इथे येऊन पोचेल.

पू. भार्गवराम : ते बैल बोलतात का ? राजण्णा साधक आहेत का ?

पू. राधा प्रभु : राजण्णा साधक नाही. त्याच्याकडे काही वर्षांपासून बैलगाडी आहे. बैलांना तो बोललेले सर्व समजते.

पू. भार्गवराम : राजण्णांना इथे येण्याची प्रेरणा कुणी दिली.

पू. राधा प्रभु  : राजण्णांच्या गावात जाऊन सनातनच्या साधकांनी प्रचार केला. तिथे हिंदूंच्या अनेक संघटना आहेत. जवळच्या गावातूनही साधक सनातन संस्थेच्या कार्यक्रमांना येतात.

पू. भार्गवराम : सनातन संस्थेच्या कार्यक्रमांना राजण्णासुद्धा गेले होते का ?

पू. राधा प्रभु  : हो. आपले साधक सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यक्रमांचा प्रचार करतात. राजण्णांनी आता साधनेला प्रारंभ केला आहे. ते सत्संगाला, तसेच प्रशिक्षणवर्गाला जातात. तिथे पाहिलेले आणि ऐकलेले ते सर्व बैलांना सांगतात.

१ इ. पू. राधा प्रभु यांनी पू. भार्गवराम यांना ‘बैल (नंदी) हे शंकराचे वाहन आहे’, असे सांगून त्यांच्या मनात प्राण्यांविषयी आदरभाव निर्माण करणे

पू. भार्गवराम : बैलांना ते सर्व समजते का ?

पू. राधा प्रभु : समजते. बैल हे भगवान शंकराचे वाहन आहे. भगवान विष्णूचे हिंदु राष्ट्र (रामराज्य) भारतात स्थापन करण्याच्या महान कार्यात भगवान शिवाची अनुमती आहे. सनातन संस्थेत विष्णुभक्त, शिवभक्त एवढेच नव्हे, तर अनेक देवतांचे पूजन करणारे साधक आहेत.

पू. भार्गवराम : ती बघ, गाडी आली. (पू. भार्गवराम आनंदाने नाचतात.)

२. राजण्णा आणि त्यांची बैलगाडी मंगळुरू येथे येणे

राजण्णा आणि त्यांची बैलगाडी मंगळुरू येथे आल्यावर पू. भार्गवराम यांनी अन्य साधकांच्या साहाय्याने प्रवेशद्वार उघडले. सर्वांनी त्यांचे आदराने स्वागत केले. राजण्णांनी गाडीतून उतरून संत आणि साधक यांना नमस्कार केला. बैलांनी पुढचे पाय दुमडून, डोेके झुकवून नमस्कार केला. ते पाहून तेथे असलेले संत आणि साधक यांची भावजागृती झाली. त्यांनी एकमेकांची ओळख करून घेतली.

२ अ. राजण्णांनी संत ज्ञानेश्‍वरांच्या काळात बैलांनी त्यांना केलेल्या साहाय्याविषयी सांगून साधकांकडे सेवा मागणे

राजण्णा : संत ज्ञानेश्‍वर, त्यांचे दोन भाऊ आणि बहीण हे आळंदीच्या पंडितांकडून निम्न जातीचे म्हणून हिणवले गेल्याने दिशाहीन होऊन कुठेतरी जात असतांना भगवंताने त्या बालकांना आमच्याच गाडीत बसवून आमच्या आणि गावाच्या साहाय्याने आश्रय दिला. ते प्रतिदिन सत्संग करायचे. ते भगवद्गीतेचे सार गावातल्या लोकांना समजेल, अशा सुलभ भाषेत सांगायचे. मी प्रतिदिन या बैलांना त्याविषयी सांगत असे. साधकहो, कृपया आपण आम्हाला सेवा द्यावी.

साधक : असो, आम्ही तुम्हाला सेवा देऊ.

२ आ. राजण्णांनी आगामी आपत्काळात बैल करू शकणार्‍या सेवांविषयी सांगणे

राजण्णा : या बैलांची सेवाही अगाध आहे. भार उचलणे, साहित्य तसेच मानवांची ने-आण करणे, भुकेल्यांना लांबून आहार आणून देणे इत्यादी सेवा हे बैल करतात. ‘आपत्काल केव्हा आणि कसा येईल ?’, हे सांगता येत नाही. हो ना ? तेव्हा वीज, पाणी, पेट्रोल, डिझेल नसेल, वैद्य नसतील, औषधे नसतील. अन्नधान्याचा तुटवडा भासेल. तेव्हा हे बैल पुष्कळ सेवा करतील. आमच्या गावात अनेक बैलगाड्या आहेत. आवश्यकता असल्यास आम्ही त्यांना साहाय्यासाठी बोलवू. ‘श्रीरामाला सीतेच्या शोधकार्यात गरूड, वानर, खार इत्यादी प्राणी आणि पक्षी यांनी साहाय्य केले’, हे आपल्याला ठाऊक आहेच. त्या सर्वांच्या साहाय्याने आणि गुरुकृपेने साधकांचे अनेक प्रकारे रक्षण करण्यासाठी सर्व नंदींना भगवान शंकराने आशीर्वाद दिला आहे.

साधक : या नंदींना कुठे आसरा द्यायचा ? कोणता आहार द्यायचा ?

२ इ. राजण्णांनी ‘बैल संपत्काल आणि आपत्काल यांत गुरु अन् स्वामी यांची सेवा करतील’, असे सांगणे

राजण्णा : हे नंदी भगवान शिवाच्या परिवारातील असल्याने आपल्याला यांचे पालन करायला काही त्रास होणार नाही. संपत्काल आणि आपत्काल यांत हे बैल गुरु आणि स्वामी यांची सेवा करून अनुभूती देतील. भूकंप झाल्यास मोठे-मोठे दगड पडून प्रयाणात अडथळा येतो. त्या वेळी हे बैल ते दगड उचलून कडेला टाकतील.

पू. भार्गवराम : बैलांना हात नाहीत ना ?

राजण्णा : बैलांना बलिष्ठ अशी शिंगे आहेत. त्यांच्या साहाय्याने ते दगड उचलून कडेला टाकतील. मनुष्याला असाध्य अशी काही कामे बैल करतात.

(राजण्णांनी साधकांसह पुष्कळ सेवा केली. बैलांना बागेत नारळाच्या झाडांना बांधून पाणी आणि खायला देऊन सन्मान केला. ‘भगवान शिवाने नंदीला पाठवले आहे’, या भावाने सर्व साधकांनी त्यांची पूजा आणि सत्कार करून धन्यताभावाचा अनुभव घेतला.)

‘अशा संतांच्या सहवासात पू. भार्गवराम असतांना त्यांच्या भविष्याची चिंता करण्याची मला काहीच आवश्यकता नाही’, या विचाराने मला परात्पर गुरु डॉक्टर आठवले आणि पू. आजी यांच्या चरणी कृतज्ञता वाटते. ‘मुलांना येणार्‍या आपत्काळाविषयी सांगण्यासाठी ही उत्तम गोष्ट आहे’, असे वाटले. ’

– सौ. भवानी प्रभु, मंगळुरू, कर्नाटक. (२७.११.२०१९)