विरार (जिल्हा पालघर) येथील सनातनच्या साधिका सौ. सुनीता राजपूत (वय ६५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. सुनीता राजपूत

मुंबई – जीवनातील अत्यंत कठीण प्रसंगातही स्थिर, समाधानी आणि आनंदी राहून सतत भगवंताच्या अनुसंधानात रहाणार्‍या विरार (जिल्हा पालघर) येथील सनातनच्या साधिका सौ. सुनीता राजपूत (सौ. कोळी) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. २९ डिसेंबर २०२० या दिवशी सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी ही आनंदवार्ता ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून दिली. सनातन संस्थेच्या पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सौ. सुनीता राजपूत यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली. सौ. राजपूत यांची आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यानंतर सनातनचे साधक श्री. हेमंत पुजारे यांनी त्यांना श्रीकृष्णाची प्रतिमा भेट दिली.

‘ऑनलाईन’ सत्संगामध्ये ‘साधक प्रार्थना आणि कृतज्ञता कशी व्यक्त करतात ?’, याविषयी सांगत असतांना सौ. सुनीता राजपूत यांनी कृतज्ञता सांगितली. त्या वेळी सर्व साधकांचा भाव जागृत झाला. आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यानंतर मनोगत व्यक्त करतांना सौ. सुनीता राजपूत यांनी जीवनातील कठीण प्रसंगात परात्पर गुरुदेव आणि भगवंत यांनी त्यांना कशा प्रकारे साहाय्य केले, याविषयीचे अनुभव सांगितले.