SRSmahotsav Delhi 2025 : सनातन राष्ट्र निर्मितीसाठी ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात सहभागी व्हा !  – संजय शेठ, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री

  • देहली येथे घुमणार सनातन राष्ट्राचा शंखनाद !

  • रांची येथे पत्रकार परिषद

डावीकडून श्री. प्रेम वर्मा, डॉ. रेणुका तिवारी, श्री. चंद्रकांत रायपत, बोलतांना श्री. संजय शेठ, श्री. शंभू गवारे आणि श्री. प्रभुलाल पटेल

रांची (झारखंड) – हिंदूंनी कधीही कुणाचे धर्मांतर केले नाही. आक्रमण करण्याची हिंदूंची संस्कृती नाही; परंतु कुणी सनातन धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करत असेल, तर आपल्या संस्कृतीचे रक्षण करणे हे प्रत्येक हिंदूंचे आद्यकर्तव्य आहे. सनातन राष्ट्राच्या निर्मितीसाठीच सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आहे. अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मध्वज फडकवून सनातन संस्कृतीच्या रक्षणाचा संदेश दिला आहे. आता ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात सहभागी होऊन सनातन राष्ट्राच्या निर्मितीसाठी सिद्ध व्हा, असे आवाहन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय शेठ यांनी केले.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय शेठ

देहली येथे १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी होणार्‍या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची माहिती देण्यासाठी २८ नोव्हेंबर या दिवशी रांची येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. संजय शेठ बोलत होते. या वेळी व्यासपिठावर विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्याचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत रायपत, ‘रांची सिटीजन फोरम’च्या अध्यक्षा डॉ. रेणुका तिवारी, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे, ‘मातृभूमी’चे झारखंड राज्याचे अध्यक्ष श्री. प्रेम वर्मा आणि रांची येथील ‘अखिल भारतीय कच्छ कडवा पाटीदार समाजा’चे श्री. प्रभुलाल पटेल उपस्थित होते.

या वेळी श्री. संजय शेठ म्हणाले, ‘‘रामायण-महाभारत काळापासून सनातन धर्माच्या रक्षणासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, नेताजी सुभाषचंद्र बोस आदींनी सनातन राष्ट्रावरील आक्रमणांचा नि:पात केला. हिंदूंनी या महापुरुषांचे बलीदान लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राच्या सिद्धतेसाठी सिद्ध व्हावे.’’

धर्म आणि राष्ट्र सेवेची प्रेरणा देणारा महोत्सव ! – शंभू गवारे, पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. शंभू गवारे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी रामराज्यासम आदर्श ‘सनातन राष्ट्र’ स्थापन करण्याचा पवित्र संकल्प केला आहे. महाभारत युद्धापूर्वी भगवान श्रीकृष्णाने शंखनाद केला, त्याचप्रमाणे हा महोत्सव धर्मनिष्ठ समाजातील आत्मशक्ती जागृत करून धर्म आणि राष्ट्र सेवेची प्रेरणा देणारा शंखनाद आहे. या महोत्सवात ‘सनातन संस्कृती संवाद’, सांस्कृतिक-सामाजिक घडामोडी, राष्ट्रीय सुरक्षा, आतंकवाद-नक्षलवाद यांची पार्श्वभूमी, संरक्षणनीती आणि राष्ट्रबळ दृढ करण्याचे उपाय या विषयांवर तज्ञ उद्बोधन करतील. या प्रदर्शनात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांची ‘भवानी तलवार’ प्रत्यक्ष दर्शनासाठी उपलब्ध होईल. पारंपरिक युद्धकलांची प्रात्यक्षिके या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असेल.

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी महोत्सवात एकजूट दाखवावी ! – चंद्रकांत रायपत, अध्यक्ष, विश्व हिंदु परिषद, झारखंड

श्री. चंद्रकांत रायपत

सनातनी समाजाला जागृत करण्याची आवश्यकता आहे. हिंदू जागृत होत आहेत. श्रीराममंदिराच्या उभारणीची प्रतिज्ञा पूर्ण झाली आहे. त्यावर धर्मध्वज फडकला आहे. विश्व हिंदु परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या महोत्सवात सहभागी होणार आहेत. कोणत्याही प्रकारे भेद न बाळगता ‘हिंदु’ म्हणून सर्वांनी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सहभागी व्हावे. देशातील विविध भागांतील हिंदु धर्मप्रेमी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या महोत्सवात एकजूट दाखवावी.

महोत्सवाद्वारे सनातन संस्कृती रक्षणाचा संदेश विश्वभर पोचेल ! – डॉ. रेणुका तिवारी, अध्यक्षा, ‘रांची सिटीजन फोरम’

डॉ. रेणुका तिवारी

हिंदू एकत्र आले नाहीत, तर भविष्यात भारतभूमीचे आणखी तुकडे होतील. हिंदु धर्मावरील आघात पहाता हिंदू संघटित राहिले, तरच सुरक्षित रहातील. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव समस्त हिंदूंची एकजूट साधणारा आहे. या महोत्सवातून सनातन संस्कृतीचा संदेश विश्वभर पोचेल.

मातृभूमी’चे झारखंड राज्याचे अध्यक्ष श्री. प्रेम वर्मा म्हणाले, ‘‘सनातन राष्ट्राच्या रक्षणासाठी हिंदूंनी जागृत होणे आवश्यक आहे. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाद्वारे हे कार्य होईल. या महोत्सवाच्या माध्यमातून हिंदूंचे संघटन होईल.’’

महोत्सवात या मान्यवरांची उपस्थिती लाभणार !

श्रीराम जन्मभूमी न्यास कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज, मेहंदीपूर बालाजी मंदिराचे प.पू. डॉ. नरेशपुरीजी महाराज, हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, तसेच सनातन संस्थेच्या उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सर्वांना मार्गदर्शन करतील.

यासह केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ, देहलीचे सांस्कृतिकमंत्री कपिल मिश्रा, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, भारताचे माजी सरन्यायाधीश उदय लळीत, उत्तरप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष श्री. सतीश महाना, भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे माजी प्रधान सल्लागार लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य श्री. प्रियांक कानुनगो, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत’चे अध्यक्ष आणि भारताचे माजी माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर, ‘प्राच्यम् ओटीटी’चे संस्थापक कॅ. प्रवीण चतुर्वेदी, सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, ‘सुदर्शन टीव्ही’चे प्रमुख संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात नावनोंदणीसाठी → SanatanRashtraShankhnad.in
या संकेतस्थळाला जिज्ञासूंनी भेट द्यावी.