Uday Samant : तीर्थक्षेत्र आळंदीनजिक होणारे पशूवधगृह होऊ देणार नाही ! – उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

दैनिक ‘सनातन प्रभात’चे वृत्त आणि हिंदु जनजागृती समितीने दिलेले निवेदन यांचा परिणाम !

उद्योगमंत्री उदय सामंत

आळंदी (जिल्हा पुणे) – तीर्थक्षेत्र आळंदीच्या जवळ पशूवधगृह होऊ नये, या संदर्भातील निवेदन मला मिळाले आहे. सर्व संत-महंत यांच्या साक्षीने मी घोषित करतो की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने विकास आराखड्यात पशूवधगृहासाठी दिलेले आरक्षण काढून टाकू आणि तेथे कोणत्याही परिस्थितीत हे पशूवधगृह आम्ही होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांनी दिली. ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप यांच्या षष्ठपूर्तीच्या निमित्ताने आळंदीत कृतज्ञता सोहळा आणि गौरव ग्रंथाचे प्रकाशन आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी बोलतांना त्यांनी ही ग्वाही दिली.

आळंदी तीर्थक्षेत्राजवळ पशुवधगृह उभारण्याचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा घाट !

पिंपरी-चिंचवड महापालिकेने आळंदी आणि देहू तीर्थक्षेत्रांच्या, तसेच प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या आश्रमाच्या जवळ ४ एकरमध्ये पशूवधगृह बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’ने सविस्तर वृत्त देऊन त्याला वाचा फोडली होती, तसेच याविषयी वारकरी आणि प्रशासन यांच्या भूमिकाही प्रसिद्ध केल्या होत्या.

हे वाचा → आळंदी तीर्थक्षेत्राजवळ पशूवधगृह उभारण्याचा प्रशासनचा कट !

यासह हिंदु जनजागृती समितीने या संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत, आळंदी नगर परिषद यांना निवेदन दिले. समितीने विविध वारकरी संघटनांच्या प्रमुखांना भेटून याची माहिती दिली आणि त्याची दाहकता लक्षात आणून दिली. त्याच्या एकत्रित परिणामुळे अंततः उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ‘आळंदीच्या जवळ प्रस्तावित पशूवधगृह बांधण्यात येणार नाही’, अशी ग्वाही दिली.