आषाढी यात्रेसाठी ११ लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती ! – राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी

वारकर्‍यांसाठी बुंदी लाडूच्या प्रसादाची निर्मिती करतांना कर्मचारी

पंढरपूर – पंढरपूर येथील आषाढी यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक येत आहेत. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन ‘श्रीं’चा प्रसाद म्हणून मंदिर समितीच्या वतीने ११ लाख बुंदी लाडू प्रसाद आणि ७५ सहस्र राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. यात बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती मंदिरे समितीच्या वतीने करण्यात येत असून राजगिरा लाडू प्रसाद बाहेरून खरेदी करण्यात येत आहे, अशी माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

व्यवस्थापक प्रवीणकुमार घम म्हणाले, ‘‘भाविकांसाठी ७० ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू प्रतिपाकीट २० रुपये दराने, तसेच २५ ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू प्रतिपाकीट १० रुपये दराने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या लाडूमध्ये हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा डबल रिफाईंड तेल, काजू, बेदाणे, वेलची आदी दर्जेदार साहित्याचा वापर केला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असून लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेद्वारे पडताळणी करून तो खाण्यास योग्य असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. हा प्रसाद सिद्ध करण्याठी अनुमाने ११० कर्मचारी आणि स्वयंसेवक २४ घंटे भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत.’’