मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्‍यावर कचर्‍याचे साम्राज्य !

वृत्तवाहिनीने वृत्त दाखवल्यावर पालिकेला जाग !

मुंबई – मुंबईतील प्रसिद्ध जुहूच्या समुद्रकिनार्‍यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. त्यात प्लास्टिक, थर्माकॉल, कपडे, पिशव्या, ओला कचरा आणि इतर घाणही होती. समुद्राच्या भरतीमुळे किनार्‍यावर मोठ्या प्रमाणात असा कचरा येतो; पण तो पालिका प्रशासनाकडून वेळेत उचलला गेला नाही. एका वृत्तवाहिनीने हे वृत्त दाखवल्यावर पालिका प्रशासन जागे झाले आणि त्यांनी कचरा उचलण्यास प्रारंभ केला. कचर्‍याचे प्रमाण पहाता ते अल्प वेळेत उचलले जाईल, अशी शक्यता अल्प आहे.

स्थानिक नगरसेविका सुधा सिंह म्हणाल्या, ‘‘कचरा उचलण्यासाठी मनुष्यबळ आणि वाहनांची संख्या अपुरी आहे. यंत्रणा वाढवण्याची मागणी सातत्याने पालिकेकडे केली आहे. कचर्‍याचे प्रमाण अधिक असल्याने संपूर्ण किनारा एका दिवसात स्वच्छ करणे शक्य होणार नसून यासाठी नियोजनबद्ध मोहिमेची आवश्यकता आहे.’’

संपादकीय भूमिका

  • जर वृत्तवाहिनीने वृत्त दाखवले नसते, तर महापालिका प्रशासन हा कचरा कधी हटवणार होते ?
  • भरतीनंतर कचरा किनार्‍यावर आला असतांना तो तातडीने हटवण्याचे नियोजन का केले नाही ?