रायगड जिल्ह्यात भूमीच्या व्यवहारातील महसुलात वाढ !

तिसर्‍या मुंबईच्या दिशेने वाटचाल !

अलिबाग – रायगड जिल्ह्यात गेल्या ९ महिन्यांत भूमीच्या व्यवहारातून तब्बल २ सहस्र ७३७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. उर्वरित ३ महिन्यांत आणखीन १ सहस्र कोटींची भर अपेक्षित असणार आहे. रायगड जिल्ह्याची वाटचाल तिसर्‍या मुंबईच्या दिशेने चालू झाली आहे. १ अब्ज रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प येत्या काळात जिल्ह्यात येऊ घातले आहेत.

अटल सेतूच्या निर्मितीनंतर रायगड जिल्ह्यातील भूमींच्या खरेदी-विक्रीला गती आली आहे. पनवेल, उरण, खालापूर, कर्जत, पेण आणि अलिबाग तालुक्यांचा एम्.एम्.आर्.डी.ए. विस्तारीत क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. ‘युनिफाईड डेव्हलपमेंट कन्ट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन’ लागू झाल्यानंतर या परिसरातील बांधकामांवर असलेल्या निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

जलवाहतुकीच्या माध्यमातून दक्षिण मुंबईचा परिसर रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल आणि उरण तालुक्यांना जोडला गेला आहे. अलिबाग विरार बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्प, रेवस रेड्डी सागरी मार्ग प्रकल्प, मुंबई-गोवा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गिका या प्रकल्प यांमुळे येणार्‍या काळात मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अंतर अधिकच जवळ येणार आहे. याचा एकत्रित परिणाम रायगड जिल्ह्यातील गुंतवणुकीवर झाला आहे.

जिल्ह्यात ‘रेडीरेकनर’चे दर स्थिर असूनही महसुलाची रक्कम सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. प्रतीवर्षी साधारणपणे ७०० ते ८०० कोटींचा महसूल वाढ होतांना पहायला मिळत आहे. विक्री व्यवहारातून महसूल वाढत असला, तरी दस्तसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही. जागेला मागणी वाढत असल्याने जागेची उपलब्धता अल्प आहे. त्यामुळे बाजारमूल्य वाढत चालले आहे.