दसर्‍याला आपट्याची पाने सोने म्हणून का देतात ?

दसर्‍याला धन, ज्ञान आणि भक्ती यांची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात् सरस्वतीदेवी आणि शस्त्रास्त्रे यांचे पूजन करण्यात येते. धनसंपदा (महालक्ष्मी), शक्ती (महाकाली), ज्ञानसंपदा (महासरस्वती) या तीन शक्ती देवतांचे दसर्‍याला स्मरण केले जाते. नवरात्रोत्सवात बसवलेल्या देवीच्या मूर्ती आणि घट यांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. दसर्‍याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून आहे.

दसर्‍याच्या शुभदिनाचे महत्त्व !

‘दसरा’ शब्दाची एक व्युत्पत्ती ‘दशहरा’ अशी आहे. ‘दश’ म्हणजे दहा आणि ‘हरा’ म्हणजे हरल्या आहेत. ‘दसर्‍याच्या आधीच्या ९ दिवसांत म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्तीरूपांनी दाही दिशांवर विजय मिळवला’, असे सांगितले जाते. विजयाच्या संदर्भात या दिवसाला ‘दशहरा’, ‘दसरा’ आणि ‘विजयादशमी’ अशी नावे आहेत. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी ! या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला ‘विजयादशमी’ असे म्हटले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरील स्वतःची शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी ! या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात.

विजयीविरांच्या स्मृती म्हणून आपट्याची पाने दिली जाणे !

दसर्‍याच्या दिवशी इष्टमित्र, आप्तेष्ट, नातेवाईक यांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेला ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, वीर मोहिमेवर गेल्यानंतर तेथून जिंकून सोन्या-नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत. विजयीवीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळत असे. जिंकून आणलेल्या वस्तूंपैकी एखादी वस्तू ते देवापुढे ठेवत. देव आणि वडीलधार्‍या व्यक्ती यांना नमस्कार करून आशीर्वाद घेत. ‘या घटनेची स्मृती सध्या आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे’, असा मतप्रवाह आहे.

आपट्याच्या पानांचे धार्मिक महत्त्व !

आपट्याच्या पानांतून तेजतत्त्व प्रक्षेपित होणे : आपट्याला शास्त्रीय नाव ‘बौहिनिया रेसीमोसा’ आहे. दसर्‍याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायूमंडल शुद्ध होण्यास साहाय्य होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे.

आपट्याची पाने ही आप आणि तेज या कणांशी निगडित असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्त्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात. जेव्हा या आपट्यांच्या पानांचे आदान-प्रदान होते, त्या वेळी हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून जिवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जिवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते ते आवश्यक तत्त्व जिवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत आपकणांच्या साहाय्याने झिरपले जाते. या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसर्‍याच्या दिवशी वायूमंडलाची शुद्धी करावी. त्यानंतर ‘आपट्याच्या पानांतून प्रक्षेपित होणारे तेजतत्त्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्य स्थापनेला लागणारा वीरश्रीयुक्त भाव जागृत अवस्थेत ठेवावा’, असे सांगितले जाते.

– प्रियांका वाणी (साभार : दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’)     

अयोध्येतील रघुराजा आणि कुबेर यांच्यातील विजयादशमीची कथा !

राजा कौत्स यांनी त्यांचे गुरु वरतंतू यांच्याकडून विद्या प्राप्त केली. कौत्स राजाने आग्रह केल्यानंतर त्यांनी १४ कोटी सोन्याची नाणी दक्षिणेत मागितली; परंतु कौत्स राजाकडे एवढी नाणी नसल्यामुळे त्याने अयोध्येतील रघुराजा यांच्याकडे धाव घेतली; मात्र रघुराजाने नुकताच यज्ञ करून सर्व संपत्ती दान केली होती. त्यांनी कौत्साला दुसर्‍या दिवशी येण्यास सांगितले. रघुराजाने कुबेरावर स्वारी केली. कुबेराने रघुराजा यांना हवी तेवढी संपत्ती देण्याचे मान्य केले. त्यानुसार कुबेराने रात्री धनवर्षाव केला. या सर्व सुवर्णमुद्रा एका आपट्याच्या झाडावरून भूमीवर पडल्या. तो विजयादशमीचा दिवस होता.

– श्री. नितीन गाडगे (साभार : दैनिक ‘नवराष्ट्र’)       

आपट्याच्या भाजीची ‘रानभाजी’ म्हणून ओळख असणे

आपट्याच्या पानाला आयुर्वेदातही गौरवले गेले आहे. या वृक्षाचे शास्त्रीय नाव ‘बौहिनिया रेसीमोसा’ असून हे सिझलपिनेसी कुळातील आहे. याला अमरावती आणि यवतमाळ भागामध्ये भोसा अन् आपटा म्हणतात. आपटा हा लहानसा वृक्ष असून मार्च ते जुलै या काळात त्याला फुले येतात. त्यांच्याकडे बहुतांश लोकांचे लक्षच जात नाही; कारण ती फुले हिरवट रंगाची अगदी छोटी असतात; मात्र त्यांचा वापर खाण्यामध्ये भाजी म्हणून केला जातो.

आपट्याच्या कोवळ्या पानांची आणि फुलांची भाजी विविध क्षेत्रांतील लोक खात असल्याने याची रानभाजी म्हणूनही ओळख आहे. मलेरिया, खोकला, युरिनेशन, मासिक पाळी या आजारांवर आपट्याच्या पानांचा वापर केला जातो. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ हे जगद्गुरु संत तुकारामांचे वचन यामुळेच बहुमोल ठरले आहे.

– श्री. नितीन गाडगे (साभार : दैनिक ‘नवराष्ट्र’) 

‘आपटा’ वृक्षाची पूजा करतांना म्हणावयाचा मंत्र !


अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण ।
इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ॥

अर्थ : ‘हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर’, अशी प्रार्थना करून त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्णनाणे विकल्पाने तांब्याचे नाणे ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि वृक्षाची पाने घरी आणतात. यानंतर आपट्याची पाने सर्व नातलग आणि मित्रमैत्रिणी यांना वाटतात.

– प्रियांका वाणी (साभार : दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’)