Production Moved to China : (म्‍हणे) ‘भारतात बेरोजगारी ही सर्वांत मोठी समस्‍या, तर चीन सातत्‍याने रोजगार वाढवत आहे !’ – राहुल गांधी

अमेरिकेत जाऊन राहुल गांधी यांनी चीनवर उधळली स्‍तुतीसुमने !

डलास (अमेरिका) – राहुल गांधी यांनी त्‍यांच्‍या तीन दिवसीय अमेरिकी दौर्‍याच्‍या आरंभी चीनची भरभरून स्‍तुती केली असून जगातील नवीन उदयोन्‍मुख शक्‍ती असलेल्‍या भारताच्‍या उणिवा मांडल्‍या आहेत. येथील टेक्‍सास विद्यापिठात आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करतांना विरोधी पक्षनेते गांधी म्‍हणाले की, आता युरोप आणि अमेरिका येथेही बेरोजगारीची समस्‍या वाढत आहे. भारतातही बेरोजगारी ही सर्वांत मोठी आणि महत्त्वाची समस्‍या आहे; पण चीनला अशी कोणतीही अडचण नाही. चीन सातत्‍याने रोजगार वाढवत आहे. नोकर्‍यांच्‍या नवीन संधी निर्माण करत आहे. भारताने उत्‍पादन क्षेत्राकडे लक्ष दिले नाही. त्‍यामुळे आज बेरोजगारी ही प्रमुख समस्‍या म्‍हणून समोर आली आहे. भारताला आपली अर्थव्‍यवस्‍था सशक्‍त करायची असेल आणि बेरोजगारीशी लढायचे असेल, तर उत्‍पादन क्षेत्रावर त्‍याला लक्ष केंद्रित करावे लागेल, असे गांधी म्‍हणाले. गांधी यांचे भारतीय वेळेनुसार ८ सप्‍टेंबरच्‍या रात्री १ वाजता भाषण झाले.

गांधी पुढे म्‍हणाले की,

१. सरकारला प्रत्‍येक वेळी उत्तरदायी धरणे, संसदेत सरकारला विरोध करणे आणि हुकूमशाही चालू न देणे हे माझे दायित्‍व आहे.

२. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाला वाटते की, ‘भारत हा एक विचार आहे’ आणि आम्‍हाला वाटते की, ‘भारत हा अनेक विचारांचा देश आहे !’ (स्‍वातंत्र्यानंतर ७७ वर्षे काँग्रेसवाल्‍यांनी केवळ हिंदूंना विरोध करण्‍याचा विचार जोपासला, त्‍याचे काय ? – संपादक) तसेच प्रत्‍येकाला यामध्‍ये सहभागी होण्‍याची, स्‍वप्‍न पहाण्‍याची अनुमती दिली पाहिजे. यात त्‍यांची जात, भाषा, धर्म, परंपरा विचारात न घेता जागा दिली पाहिजे. (‘या देशाच्‍या साधनसंपत्तीवर मुसलमानांचा पहिला अधिकार आहे’, असे म्‍हणणारे काँग्रेसचे तत्‍कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्‍या विधानावर प्रथम राहुल गांधी यांनी १०० कोटी हिंदूंची कान पकडून क्षमा मागितली पाहिजे !- संपादक)

३. वर्ष २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीत भारताच्‍या लाखो लोकांना समजले की, पंतप्रधान मोदी हे भारताच्‍या राज्‍यघटनेवर आक्रमण करत आहेत. (असे आहे, तर याच निवडणुकीत भाजप विजयी झाली आणि काँग्रेसचा सपशेल पराभव झाला, हे कसे ? – संपादक)

४. जेव्‍हा मी राज्‍यघटनेविषयी बोलायचो, तेव्‍हा लोकांना मी काय म्‍हणत आहे, ते समजत होते. ते म्‍हणत होते की, भाजप आमच्‍या परंपरेवर आणि राज्‍यांवर आक्रमण करत आहे.

५. लोकांच्‍या मनात भाजपविषयी असलेली भीती नाहीशी झाली आहे. निवडणूक निकालानंतर लगेचच भारतात कुणीही भाजप किंवा भारताचे पंतप्रधान यांना घाबरत नाही, हे आपण पाहिले. त्‍यामुळे हे मोठे यश आहे. (काँग्रेसला खासदारांची तीन आकडी संख्‍याही गाठता आली नाही. याला ते यश म्‍हणत असतील, तर आता यास काय म्‍हणावे ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • राहुल गांधी यांच्‍यासारख्‍या काँग्रेसी नेत्‍यांना कुठे आणि काय बोलले पाहिजे, याचेही भान नाही. भारतविरोधी कथानक रचण्‍यासाठी ते विदेशी भूमीवर भारताचे शत्रुराष्‍ट्र चीनची स्‍तुती करतात. अशा नेत्‍यांवर राष्‍ट्रद्रोहाचा गुन्‍हा का नोंद केला जाऊ नये ?
  • चीन आणि काँग्रेसचा गांधी परिवार यांच्‍यातील जवळीक जगात सर्वश्रूत आहे. त्‍यामुळे राहुल गांधी यांच्‍याकडून असे वक्‍तव्‍य केले जाणे, यात काय आश्‍चर्य ?
  • कुठे अमेरिकेच्‍या भूमीवरून हिंदु धर्म आणि भारत यांचे सर्वश्रेष्‍ठत्‍व सांगणारे स्‍वामी विवेकानंद, तर कुठे भारताची नाचक्‍की करण्‍यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न करणारे राहुल गांधी !