नागठाणे (जिल्हा सातारा) येथे बंद पाळून ग्रामस्थांचा निषेध !

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर मुसलमान विद्यार्थ्यांनी देशाभिमानाच्या घोषणा न देऊन राष्ट्राचा अवमान केल्याचे प्रकरण !

बंद पाळून ग्रामस्थांचा निषेध

नागठाणे (सातारा) – येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट या दिवशी नागठाणेतील सर्व शाळांनी मोठ्या उत्साहात गावातून प्रभातफेरी काढली. यामध्ये गावातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या. नागठाणे येथील सोसायटीच्या मोठ्या चौकात प्रभात फेरी आल्यानंतर मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वन्दे मातरम्’ अशा घोषणा दिल्या; मात्र एका शाळेच्या काही मुलांनी (मुसलमान विद्यार्थ्यांनी) या घोषणा दिल्या नाहीत. या विषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर २१ ऑगस्ट या दिवशी विद्यार्थ्यांच्या अवमानकारक कृतीचा निषेध म्हणून नागठाणे गाव बंद करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि युवक यांनी बोरगाव पोलीस ठाणे, ग्रामपंचायत येथे निवेदन दिले, तसेच तातडीच्या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.

ग्रामसभेत ग्रामस्थांनी घोषणा न देणार्‍या विद्यार्थ्यांची शाळा बंद करण्याची मागणी केली. (अशी मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन यांना ते लक्षात येत नाही का ? – संपादक) गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

विद्यार्थ्यांना दुसर्‍या शाळेत प्रवेश द्या !

नागठाणेत असा धार्मिक कट्टरतावाद वाढीस लागणे धोकादायक आहे. त्यामुळे ‘या शाळा बंद करून त्यांना दुसर्‍या शाळा, महाविद्यालयात प्रवेश द्यावा’ अशी मागणीही लोकांच्या जमावाने पोलीस आणि ग्रामपंचायत यांना केली. जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. या वेळी पोलीस आणि ग्रामपंचायत यांनी जमावाला शांत रहाण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांच्या शाळा बंद करण्याच्या मागणीचा विचार करून कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन सरपंच डॉ. रूपाली बेंद्रे, उपसरपंच अनिल साळुंखे, ग्रामविकास अधिकारी सुरेश लादे यांनी दिले.

संपादकीय भुमिका :

  • भारतात राहून देशाभिमानाच्या घोषणा न देणार्‍यांना देशात रहाण्याचा काय अधिकार ?
  • मुसलमान विद्यार्थ्यांनी अशी कृती का केली, याच्याही मुळाशी जाऊन चौकशी होणे आवश्यक !