धर्म, अधर्म आणि सद्यःस्थितीत हिंदु धर्माचे रक्षण !

१. अधर्माला मारणे हा धर्मच !

रामायणामध्ये भगवान श्रीविष्णूचा श्रीराम अवतार आहे, जो मर्यादा पुरुषोत्तम आहे. संपूर्ण रामायण त्याच्या भोवतीच घडते किंवा तेच मुख्य चरित्र आहे. याउलट महाभारताचा पट पुष्कळ मोठा आहे. त्यामुळे यात केवळ भगवान श्रीकृष्णाच्या भोवती घटना घडत नाही, तर पांडव आणि कौरव यांच्यातील संघर्ष हाच मुख्य भाग आहे. धर्म आणि अधर्म असा यात लढा आहे. दोन्ही ग्रंथांमध्ये शेवटी धर्माचा विजय होतो आणि अधर्माचा नाश होतो. रामायणामध्ये रावणाचा नाश होतो, तर महाभारतात कौरवांचा नाश होतो. रामायणामध्ये भगवान श्रीराम अधर्माशी धर्माने लढतात आणि त्यांचा नाश करतात. ‘काही प्रसंगात श्रीराम आणि श्रीकृष्ण अधर्म नष्ट करतांना अधर्माने वागले’, असे म्हटले जाते; मात्र ‘तसे वागणे अधर्मियांना मारण्यासाठी योग्यच होते’, असे या दोघांनीही त्या त्या प्रसंगात स्पष्ट केलेले आहे.

२. अधर्मी वालीचा वध

भगवान श्रीराम माता सीतेच्या शोधात असतांना त्यांची भेट सुग्रीवाशी होते आणि तो भगवान श्रीरामांना माता सीतेचा शोध घेण्यास साहाय्य करण्याचे मान्य करतो. सुग्रीवाचा भाऊ वाली याने सुग्रीवाला राज्यातून हद्दपार करून त्यांच्या पत्नीला बलपूर्वक स्वतःकडे ठेवून घेतले होते. पत्नीची सुटका करून राज्य मिळवून देण्यासाठी वालीचा वध करण्याचे श्रीराम मान्य करतात. ‘सुग्रीवाने वालीशी युद्ध करावे, तेव्हा त्याला ठार करता येईल’, असे श्रीरामांनी सांगितले. त्यानुसार या दोघांमध्ये युद्ध चालू झाल्यावर भगवान श्रीरामांनी झाडाच्या मागे लपून वालीवर बाण मारला. वालीला श्रीरामांनी बाण मारल्याचे दिसले. त्याने मृत्यू होण्यापूर्वी श्रीरामांना ‘अधर्माने का मारले ?’, असे विचारले. त्यावर भगवान श्रीरामांनी त्याला सांगितले, ‘धाकट्या भावाची बायको, बहीण, मुलाची बायको आणि मुलगी, हे सगळे समान आहेत. ज्याने त्यांच्यावर वाईट नजर टाकली त्याला मारण्यात कोणतेही पाप किंवा अन्याय नाही. सध्या इक्ष्वांकू वंश पृथ्वीवर राज्य करत आहे आणि त्याच वंशाचे प्रतिनिधित्व करणारा मी अन् महाराज भरत यांनी तुला शिक्षा केली आहे.’ वाली धर्माने वागला नव्हता. त्याने जे केले, ते अधर्म होते. त्याला दुसर्‍यावर धर्माने वागण्याचे सांगण्याचा अधिकारच नाही. असे अधर्मी सत्तेत राहिले, तर ते अधर्मच करणार आणि मग जनताही अधर्मी होणार. त्यामुळे अशांना ‘जशास तसे’ या न्यायानेच मारायला हवे, तरच धर्माचे रक्षण होऊ शकेल, हेच यातून सांगण्यात आले आहे.

३. अधर्मियांना साथ देणार्‍या कर्णाला अधर्माने मारणे हाच धर्म !

महाभारतात कुरुक्षेत्रावरील युद्धात कर्णाच्या रथाचे चाक मातीत रुतते. चाक मातीतून काढण्यासाठी कर्ण रथाच्या खाली उतरतो. या वेळी कर्णाला ठार करण्याची आज्ञा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करतात; मात्र ‘असे करणे युद्धाच्या नियमाच्या आणि धर्माच्या विरोधात आहे’, असे कर्ण श्रीकृष्णाला सांगतो. त्यावर भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, ‘कर्णा, अधर्मी माणूस जेव्हा संकटात अडकतो, संकटाला सामोरे जातो, तेव्हा त्याला धर्माचे स्मरण होते.’ त्यानंतर श्रीकृष्णाने कर्णाला त्याच्या अधर्माने वागलेल्या कृत्यांची आठवण करून दिली.

श्रीकृष्णाने कर्णाला सांगितले, ‘द्यूत खेळण्यात फसवणूक होत होती आणि द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते, त्या वेळी तू धर्माचे नव्हे, तर अधर्माचे समर्थन केले होते. वनवासानंतरही तुझा मित्र दुर्योधनाने पांडवांना राज्य परत केले नाही, तरीही तू गप्प राहिलास. युद्धात केवळ १६ वर्षांच्या अभिमन्यूला अनेक योद्धयांनी घेरले आणि मारले, हेही अन्यायकारक होते. त्या वेळी तुझा धर्म कुठे होता ?’ यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, ‘तू थांबू नको. कर्णाचा वध कर. कर्णाला धर्मावर बोलण्याचा अधिकार नाही. याने नेहमीच अधर्माचे समर्थन केले आहे.’

श्री. प्रशांत कोयंडे

हिंदूंचे ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ हे धर्मग्रंथ भारतीय संस्कृतीसाठी महत्त्वाचे आहेत, हे वेगळे सांगायला नको. या दोघांना समोर ठेवून आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा असतो. या दोन्हींतून प्रत्येकाला त्याचा धर्म सांगण्यात आला आहे. हा धर्म म्हणजे पंथ नव्हे, तर कर्तव्य, आचार, कर्म असा आहे. जर मनुष्य धर्माने वागला नाही आणि तो अधर्म करू लागला, तर विनाश घडतो, असे या दोन्ही ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या चरित्रांतून दर्शवण्यात आले आहे. त्रेतायुगात घडलेले रामायण आणि द्वापरयुगात घडलेले महाभारत यांत अनेक गोष्टींमध्ये भेद किंवा वेगळेपण आहे. असे असले, तरी धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे, हे मूळ आहे. धर्माद्वारे अधर्मावर कशी मात करायची आणि धर्मरक्षण कसे करायचे, हे या दोन्हींमध्ये सांगण्यात आले आहे. युगे वेगळी असली, तरी एक सूत्र समान आहे. या दोघांचा विचार करून सद्यःस्थितीत हिंदु धर्म आणि भारत देश यांचे रक्षण कसे करायला हवे, याचा विचार करण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.

संकलक : श्री. प्रशांत कोयंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

४. अधर्मियांशी धर्माने वागल्यास विनाश अटळ

या दोन्ही प्रसंगांमध्ये जर अधर्मियांशी धर्माने वागण्याचा प्रयत्न करण्यात आला असता, तर या अधर्मियांनी धर्माच्या बाजूने असणार्‍यांना विनाशच केला असता. जर वालीला ठार केले नसते, तर त्याने सुग्रीवाला ठार केले असते. कर्णाला मारले नसते, तर त्याने अर्जुनाला ठार केले असते. जोपर्यंत कर्ण कौरवांसमवेत होता, तोपर्यंत पांडवांना विजय मिळाला नसता. त्यामुळे अधर्मियांनी किती धर्माचा आव आणला, तरी ते शेवटपर्यंत अधर्मीच असतात, हे लक्षात ठेवायला हवे.

५. अधर्मी महंमद घोरीशी धर्माने वागणार्‍या पृथ्वीराज चौहान यांचा झालेला आत्मघात !

आता त्रेता आणि द्वापर युगानंतर अन् सध्याच्या कलियुगाचा विचार करू. पृथ्वीराज चौहान यांनी महंमद घोरी याला १७ वेळा पराभूत केले. प्रत्येक वेळी त्याने शरणागती पत्करल्याने ‘शरणागताला ठार करू नये’, या धर्म नियमामुळे त्याला प्रत्येक वेळी पृथ्वीराज यांनी सोडून दिले; मात्र जेव्हा शेवटी घोरीचा विजय झाला, तेव्हा त्याने चौहान यांना ठार केले. जर आपण धर्मग्रंथ आणि अवतार यांकडून अधर्मियांशी कसे वागावे, हे शिकून त्यानुसार आचरण केले नाही, तर विनाश अटळ असतो. पृथ्वीराज चौहान यांच्या पराभवानंतर भारत मुसलमान आक्रमणांच्या कह्यात गेला आणि पुढे ५०० वर्षे भारताची जी हानी झाली, तो इतिहास आपण जाणतो.

६. पापभिरूपणामुळे होणारा आत्मघात

‘मोगल जेव्हा हिंदु राजांशी युद्ध करत असत, तेव्हा ते गाय, वासरू यांना पुढे ठेवत. गोवंशांना मारल्याखेरीज शत्रूला मारता येणार नाही, हे लक्षात येऊनही गोहत्या केल्याने पाप होईल, यामुळे हिंदूंनी शस्त्रे खाली ठेवल्याने हिंदूंनी अनेक राज्ये गमावली’, असे सांगितले जाते. येथे ‘देव, देश आणि धर्म वाचवण्यासाठी अधर्मियांचे डावपेच समजून घेऊन वागणे आवश्यक ठरते’, हे भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याकडून शिकले पाहिजे.

७. अधर्मी मुसलमान आक्रमकांशी ‘जशास तसे’ वागणारे एकमेवाद्वितीय छत्रपती शिवाजी महाराज !

छत्रपती शिवाजी महाराज

अचानक शत्रूवर आक्रमण करून पलायन करणे, याला ‘गनिमी कावा’ म्हणतात. गनिमी कावा समोरासमोरील युद्धाचा भाग होत नाही. याला युद्धाचे कोणतेच नियम लागू होत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गनिमी काव्याद्वारे ५ पातशाह्यांना जेरीस आणून हिंदवी स्वराज स्थापन केले. स्वराज्यासाठी लागणारा पैसा मोगलांची सूरत लुटून उभा केला. याला लूटमार म्हटली जात नाही. अधर्मी मुसलमान आक्रमकांना पराभूत करण्याची ही नवीन पद्धत महाराजांनी आणली; म्हणून देशात आज हिंदू बहुसंख्य दिसत आहेत. अन्यथा भारत इस्लामीस्तान झाला असता.

८. ‘अधर्मियांना कोणतीच दया-माया नको’, हे शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज !

सेनापती प्रतापराव गुजर यांनी बहावलखान याला पराभूत करून पकडल्यानंतर त्याने क्षमायाचना केल्यावर गुजर यांनी त्याला सोडून दिले. हे छत्रपती शिवाजी महाराजांना कळल्यावर ते संतप्त झाले आणि त्यांनी बहावलखान याला पकडणे किंवा ठार केल्याखेरीज तोंड न दाखवण्याचा आदेश दिला. यातून ‘शत्रूवर कोणतीही दया-माया दाखवू नये’, हेच त्यांनी शिकवले. याच मोगलांनी कधी हिंदूंवर, त्यांच्या सरदारांवर दया-माया दाखवली नव्हती.

९. धर्मांतराला शुद्धीकरणाद्वारे प्रत्युत्तर देणारे छत्रपती शिवाजी महाराज !

मोगलांपासून भारतात हिंदूंचे धर्मांतर चालू केले. हिंदु धर्मामध्ये कुणाचे धर्मांतर झाल्यास पुन्हा हिंदु धर्मात घेण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे असे सहस्रो धर्मांतरित पुन्हा हिंदु धर्मात येण्याच्या इच्छा बाळगून होते; मात्र त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीत ते स्वीकारले गेले नव्हते. ही आत्मघाती सामाजिक स्थितीही छत्रपती शिवाजी महाराज यांनी पालटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सर्वप्रथम देशात धर्मांतरितांच्या शुद्धीकरणाचा पायंडा पाडला. यापूर्वी असा प्रयत्न कधीही आणि कुणीही केल्याचे ऐकिवात नाही. अधर्मी अधर्माने त्यांची संख्या वाढत जाते, हे लक्षात घेऊन महाराजांनी शुद्धीकरण चालू केले. महाराजांची ही परंपरा मोठ्या प्रमाणात पुढे पेशव्यांनी चालवली असती, तर भारतात आज कोट्यवधी मुसलमान राहिले नसते.

छत्रपती शिवाजी महाराजांना जे उमगले आणि जे त्यांनी कृतीत आणले, तोच भाग हिंदूंनी परिस्थितीनुसार विचार करून केला पाहिजे आणि अधर्मियांशी रक्षणार्थ लढले पाहिजे. त्यातून देव, देश आणि धर्म यांचे रक्षण होऊ शकते.

१०. अधर्मियांशी ‘तथाकथित’ धर्माने वागणारे मोहनदास गांधी !

धर्मांध मुसलमानांमुळे भारताची फाळणी झाली. त्या वेळी १० लाख हिंदूंची कत्तल झाली. लाखो हिंदु महिलांवर बलात्कार झाले. याला मोहनदास गांधी आणि काँग्रेसची हिंदुद्वेषी मानसिकता अन् आत्मघाती राजकारण आहे, हे आता भारतीय जनतेला स्पष्ट होऊ लागले आहे. धर्मांध धर्माने वागणारे नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी धर्माने वागणे, हा आत्मघात होता आणि तो गांधी, नेहरू यांनी केला. आज त्याची फळे हिंदू भोगत आहेत. ज्यांनी त्यांचा धर्म अधर्माद्वारे संपूर्ण जगात वाढवला त्यांच्याशी कधीही धर्माने वागता येणार नाही, हे ज्या वेळी हिंदू आणि जन्महिंदु शासनकर्ते यांना लक्षात येईल किंवा लक्षात घेऊन धर्म वाचवण्यासाठी प्रयत्न करतील तोच हिंदूंसाठी परिवर्तनाचा दिवस असेल; मात्र असे काही होईल, अशी अपेक्षा करता येत नाही.

११. सध्याचा धर्म आणि अधर्म !

भारतात सध्या धर्म आणि अधर्म पाहिल्यास ‘धर्मनिरपेक्षता’ हाच हिंदूंसाठी अधर्म ठरलेला आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंशी अधर्माने वागले जात आहे, तर अधर्मियांना डोक्यांवर बसले जात आहे. जे बसवतात, तेही अधर्मीच आहेत, हे वेगळे सांगायला नको. अशांना बहुसंख्य हिंदु जनता सत्तेवरही बसवत आली आहे. असे अधर्मी सत्तेवर आल्यानंतर धर्माचरणींचा ते छळ करत आले आहेत आणि करत आहेत अन् पुढेही करत रहाणार आहेत. अशांना विरोध करण्यासाठी धर्माने वागायची आवश्यकता आहे, असे म्हणता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार आहे आणि अनेक राज्यांतही भाजपचे सरकार आहे. देहली, बंगाल, तेलंगाणा, कर्नाटक, केरळ या राज्यांत अन्य पक्षांचे राज्य आहे. येथे हिंदूंच्या संदर्भात अधर्माने वागले जात आहे, तर अधर्मियांना जावयासारखी वागणूक मिळत आहे.

१२. अधर्माने वागणारी काँग्रेस !

काँग्रेस जेव्हा केंद्रात सत्तेत होती, तेव्हा तिने विरोधी पक्षांची राज्य सरकारे बलपूर्वक आणि लोकशाही मूल्यांना चिरडून अन् राज्यघटनाविरोधी निर्णय घेत विसर्जित केली होती. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी अयोध्येतील श्रीराजन्मभूमीवरील बाबरी ढाचा हिंदूंनी पाडल्यावर उत्तरप्रदेशातील भाजपचे सरकार विसर्जित केले. इतकेच नव्हे, तर त्या वेळी राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यांतील भाजपची सरकारेही सूडबुद्धीने विसर्जित केली. हा अधर्म होता. अशा अधर्मियांची काही राज्यांत असलेली सरकारे केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर पाडण्यात आलेली नाहीत. वास्तविक ती विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लावणे धर्मानुसार आवश्यक आहे. बंगाल आणि केरळ राज्यांत भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या होऊन, हिंदूंचा छळ होऊनही भाजपने तेथील सरकारांना विसर्जित केलेले नाही. हा धर्म होऊ शकत नाही. यातून हिंदूंचा विनाश होत आहे. भाजपने धर्माचे पालन केले; म्हणून हे अधर्मी त्याचे कौतुक करतील, अशीही अपेक्षा करता येत नाही किंवा ते तसे करतही नाहीत. येथे अधर्मियांशी ‘जशास तसे’ वागणे आवश्यक आहे. उद्या केंद्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार आले, तर भाजपची सरकारे टिकून रहाणार नाहीत. कारण अधर्मी धर्माने नाही, तर अधर्मानेच वागणार आहेत. संपूर्ण देशात हिंदूंना सळो कि पळो करून सोडले जाईल, तर धर्मांधांना, आतंकवाद्यांना कडेवर घेऊन बिर्याणी खाऊ घातली जाईल. त्यामुळे धर्माने वागण्याचा आत्मघाती अट्टाहास न करता अशांना कठोर धडा शिकवणार्‍या धर्माचे पालन केले पाहिजे. भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे.

१३. कठोर निर्णय घेणे हाच धर्म !

टप्प्याटप्प्याने आणि संसदेतील बहुमतानंतर कायद्यांत पालट करता येईल किंवा कायदे रहित करता येतील किंवा नवीन कायदे करता येतील, असा जर कुणी विचार करत असेल, तर ते शक्य होणार नाही, हे आताच्या लोकसभा निवडणुकीतच दिसून आले आहे. आता धर्माच्या रक्षणार्थ कायदे पालटता येणार नाहीत कि नवीन करता येणार नाहीत, हे अत्यंत स्पष्ट आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या धर्माने वागण्याऐवजी देशात आणीबाणी लागू करून हिंदुविरोधी, देशविरोधी कायदे, नियम आदी सर्व रहित करून देव, देश आणि धर्म वाचवणारे कायदे केले गेले पाहिजेत. आतंकवादी, जिहादी यांना धडा शिकवला पाहिजे. हा धर्मच असणार आहे. याला जे अधर्म म्हणतील, तेच मुळात अधर्मी आहेत. धर्मासाठी आणीबाणी लागू करून कठोर निर्णय घेतल्यास बहुसंख्य हिंदु जनता डोक्यावर घेणार नाही का ? ‘धर्माे रक्षति रिक्षताः’ असे वचन आहे. ‘धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म रक्षण करतो’, याची अनुभूती घेता येऊ शकते. (२१.८.२०२४)

संपादकीय भूमिका 

हिंदुविरोधी आणि देशविरोधी कायदे अन् नियम आदी सर्व रहित करून देव, देश आणि धर्म वाचवणारे कायदे करणे, हा धर्मच आहे !