बेशिस्त वाहनचालकांकडून १२ कोटी रुपयांचा दंड वसूल !

पुणे येथे दीड महिन्यात १ सहस्र ६८४ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – शहर परिसरामध्ये मद्य पिऊन वाहनचालकांच्या संख्येत भर पडत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये अपघात घडत आहेत. अशा मद्य पिऊन वाहन  चालवणार्‍यांच्या विरोधात पोलिसांनी मोहीम चालू केली आहे. २१ मे ते ८ जुलै या कालावधीत १ लाख ५८ सहस्र २६९ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १२ कोटी २१ लाख ९३ सहस्र ५५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून त्यांचे वाहन चालवण्याचे परवाने ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत.

कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघातानंतर पोलिसांनी मद्यपी चालकांच्या विरोधातील मोहीम तीव्र केली आहे. मद्य पिऊन वाहन चालवल्यास संबंधित वाहनचालकाचा परवाना ३ महिन्यांसाठी निलंबित केला जात आहे. तरीही पुन्हा मद्य पिऊन वाहन चालवतांना निदर्शनास आल्यानंतर परवाना कायमस्वरूपी रहित केला जाणार आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे साहाय्य घेतले जाणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.

मद्य पिऊन वाहन चालवणे, वाहन भरधाव चालवणे, क्रमांक नसलेले वाहन चालवणे, दोनचाकीवरून तिघांनी प्रवास करणे, विरुद्ध दिशेने जाणे अशा प्रकारच्या नियमभंग करणार्‍या वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका :

  • आजपर्यंतच्या शासनकर्त्यांकडून जनतेला शिस्त न लावल्याचा दुष्परिणाम !
  • दंड वसूल करण्याची मोहीम नियमितपणे राबवून त्याच त्याच चुका करणार्‍यांना अधिक कठोर शिक्षा करणे आवश्यक !
  • मद्य पिऊन वाहन चालवल्यास ३ महिने परवाना निलंबित