Pakistani Nurses Scammed : सौदी अरेबियाने फसवणूक करणार्‍या पाकिस्तानी परिचारिकांना हाकलले !

पाकिस्तानी पत्रकाराने पाकवर टीका करत केले भारताचे कौतुक ! 

रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध अतिशय चांगले मानले जातात; पण मार्चमध्ये सौदी अरेबियाने पाकिस्तानमधील ९२ परिचारिकांना परत पाठवले होते. सौदी अधिकार्‍यांना त्यांच्या अन्वेषणात असे आढळून आले की, एका खासगी भरती संस्थेने अनेक परिचारिकांना समान पडताळणी अहवाल दिला होता. नेहमीच्या ऑनलाईन पडताळणीमध्ये हा खोटेपणा आढळून आल्यानंतर सौदी अधिकार्‍यांनी त्यांना परत केले. पाकिस्तानमध्ये ज्या संस्थेने ही फसवणूक केली होती, त्यांना काळ्या सूचीत टाकण्यात आले होते. या घटनेमुळे पाकिस्तानी पत्रकार कमर चीमा यांनी पाक सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘‘पाकिस्तान सौदीला आपला भाऊ म्हणतो आणि आम्ही त्यांची फसवणूक करतो. थोडे पैसे वाचवण्यासाठी आम्ही त्या परिचारिकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. आपली प्रतिमा खराब केली आणि भविष्यासाठी आपले दरवाजे बंद केले. हे ‘शॉर्टकट’चे व्यसन आहे.’’

भारतीय अधिक विश्‍वासार्ह !

कमर चीमा

कमर चीमा पुढे म्हणाले, ‘‘सौदीमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी एकत्र काम करत आहेत; मात्र भारतियांची संख्या वैद्यकीय क्षेत्रात अधिक आहे. येथे डॉक्टरांना मान मिळत नाही. चांगली गोष्ट, म्हणजे या परिचारिकांना फसवणूक प्रकरणात तुरुंगात पाठवण्यात आले नाही. भारतीय लोकांकडे आमच्यापेक्षा चांगल्या संधी आहेत; कारण ते अधिक शिक्षित, अधिक प्रामाणिक आणि अधिक विश्‍वासार्ह आहेत. ते कोणत्याही कामासाठी वेळ देतात. याखेरीज ते कोणत्याही राजकीय गोष्टीत अडकत नाहीत.’’

आम्ही प्रत्येक व्यक्तीमध्ये जिहाद रुजवला !

कमर चीमा पुढे म्हणाले, ‘‘भारतीय लोक सौदीच्या कायद्याचे उल्लंघन करणारी कोणतीही गोष्ट करत नाहीत; मात्र पाकिस्तानी तेथील राजकीय घडामोडींमध्ये गुंतलेले असतात. अलीकडेच सौदीने इस्रायलच्या विरोधात घोषणा देणार्‍या पाकिस्तानींना पकडले आहे. इस्रायलविरुद्ध जे काही करायचे आहे, ते पाकिस्तान सरकार करील, हे पाकच्या नागरिकांचे काम नाही. आम्ही प्रत्येक व्यक्तीमध्ये जिहाद रुजवला आहे. मशिदींमध्ये मौलवी नेहमी सांगतात की, ‘जिहाद तुमचे दायित्व आहे.’ ते सतत लोकांना भडकवतात.’’

संपादकीय भूमिका 

पाकिस्तानी कुठेही गेले, तरी आतंकवादी कृत्य किंवा गुन्हेगारी कृत्यच करणार ! त्यामुळे जगाने आता पाकवर सर्व प्रकारचा बहिष्कार घालणे, हाच यावरील एकमेव उपाय आहे !