महाराष्ट्रात इयत्ता १० वीचा निकाल घोषित !

९५.८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण !  

मुंबई – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल २७ मे या दिवशी घोषित करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकालाविषयी सविस्तर माहिती दिली. राज्यात यंदा दहावीच्या परीक्षेला बसलेले ९५.८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभागात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्यात मुली मुलांपेक्षा पुढे आहेत. या परीक्षेत ९७.२१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर ९४.५६ टक्के मुले उत्तीर्ण झाली.

नियमित, खासगी, अपंग असे सर्व विद्यार्थी मिळून यंदा १६ लाख २१ सहस्र विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यांपैकी १५ लाख १७ सहस्र ८०२ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के लागला, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत न्यून, म्हणजे ९४.७३ टक्के लागला.