वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) नगरपरिषदेचा पाण्याचा बंब दुरुस्त न केल्यास आंदोलन करणार ! – संतोष परब, युवासेना

वेंगुर्ला : येथील नगरपरिषदेचा आग विझवण्याचा पाण्याचा बंब गेले अनेक दिवस बंद आहे. तो दुरुस्त करण्यात चालढकलपणा केला जात आहे. येत्या २ दिवसांत हा बंब दुरुस्त करून सेवेत आणा, अन्यथा युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी युवासेनेचे शहरप्रमुख संतोष परब यांनी दिली आहे.

हा अग्नीशमन बंब सुस्थितीत असता, तर ४ एप्रिल या दिवशी उभादांडा येथील हॉटेल गोलवनला लागलेली आग आटोक्यात आणून मोठी हानी टाळता आली असती. वेंगुर्ला नगरपरिषदेचा बंब बंद असल्याने सावंतवाडी नगरपरिषदेचा बंब येण्याची वाट पहावी लागली. (बंब त्वरित दुरुस्त न केल्याने आग विझवू न शकल्यावरून संबंधितांवर कारवाई का करू नये ? – संपादक) वेंगुर्ला शहरात मोठी दुर्घटना घडली असती, तर नगरपरिषदेने काय केले असते ? बंबाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष का केले जात आहे ? याचे उत्तर प्रशासनाने नागरिकांना दिले पाहिजे, असे परब यांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

  • अशी चेतावणी द्यावी लागणे नगरपरिषद प्रशासनाला लज्जास्पद !
  • असा हलगर्जीपणा करणारे आपत्काळात जनतेचे रक्षण कसे करणार ?