दीड सहस्रांहून अधिक सरकारी कर्मचार्‍यांनी शिधावाटप केंद्रांतील धान्य चोरले !

रायगड जिल्ह्यातील घटना !

अलीबाग – रायगड जिल्ह्यात शिधावाटप केंद्रांवरून १ सहस्र ६५६ सरकारी कर्मचार्‍यांनी गरिबांना विनामूल्य मिळणारे धान्य स्वतःसाठी घेतले आहे. या कर्मचार्‍यांची चौकशी चालू आहे. आधार संलग्न प्रणालीमुळे ही चोरी उघडकीस आली आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत दारिद्य्र रेषेखालील आणि अल्प उत्पन्न कुटुंबांना, म्हणजेच अनुक्रमे अंत्योदय कुटुंबांना प्रतीमास ३५ किलो, तर प्राधान्य कुटुंंबांना प्रतीव्यक्ती ५ किलो धान्य वितरण सध्या केले जात आहे. पुढील ५ वर्षांसाठी देशातील ८० कोटी लाभार्थ्यांना विनामूल्य धान्य दिले जाणार आहे. यासाठी केंद्रशासन १२ लाख कोटी रुपये खर्च करत आहे.

धान्य उचल करणार्‍यांची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांकडून धान्य वसूल केले जाईल.

संपादकीय भूमिका 

जनतेसाठी असलेले धान्य हडप करणार्‍या अशा सरकारी कर्मचार्‍यांमुळेच सरकारच्या योजना गरिबांपर्यंत पोचण्यास अडथळे येतात. या कर्मचार्‍यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !