धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी हिंदुत्वनिष्ठ आमदारांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी !

मुसलमान महिलेची न्यायालयात याचिका

डावीकडून आमदार टी. राजा सिंह, आमदार नीतेश राणे आणि आमदार गीता जैन

मुंबई – धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याच्या प्रकरणी भाजपचे आमदार टी. राजा सिंह, आमदार नीतेश राणे आणि आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा, यासाठी खार येथील आफताब सिद्धीकी या महिलेसह अन्य काही नागरिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका प्रविष्ट केली आहे. यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपिठाने ८ एप्रिल या दिवशी तातडीने सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अधिवक्ता विजय हिरेमठ यांनी १ एप्रिल या दिवशी न्यायालयापुढे ही याचिका सादर केली आहे.

याचिकेत म्हटले आहे की,  

१. निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक दंगली उसळवण्याचे भाजपचे षड्यंत्र आहे. भाजपच्या आमदारांनी मीरारोड, मालवणी, गोवंडी, घाटकोपर या ठिकाणी धार्मिक वातावरण कलुषित करणारी विधाने केली आहे.

२. लोकसभा निवडणुकीच्या काळात याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे धार्मिक दंगली भडकू शकतात. ‘सर्वोच्च न्यायालयाने भडकावू भाषणे करणार्‍यांच्या विरोधात कुणाच्या तक्रारीची वाट न पहाता पोलिसांनी स्वत:हून गुन्हे नोंदवावेत’, असा आदेश दिला आहे; मात्र मुंबई पोलिसांनी आमदारांवर गुन्हे नोंदवलेली नाहीत.

संपादकीय भूमिका 

  • मुसलमान नेत्यांकडून चिथावणीखोर विधाने केली जातात. याविरोधात याचिका प्रविष्ट करण्याची मागणी अल्पसंख्य समाजाकडून केली जात नाही, हे लक्षात घ्या !
  • हिंदुत्वनिष्ठ आमदारांनी लव्ह जिहाद, धर्मांतर आदी हिंदु धर्मावरील आघातांविषयी वक्तव्य केले असल्यास त्यामागील सत्यता पडताळण्याचा आदेशही न्यायालयाने दिल्यास यातून सत्य समाजापुढे येईल, असेच हिंदूंना वाटते !