मालगुंड प्राणी संग्रहालयामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल ! – पालकमंत्री उदय सामंत

उदय सामंत

रत्नागिरी – मालगुंड येथे प्राणीसंग्रहालय झाल्यानंतर पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. परिणामी, येथील परिसराचा विकास होईल. येथे कुणीही बेरोजगार रहाणार नाही. नागरिकांच्या संपूर्ण शंकांचे निरसन करूनच हा प्रकल्प करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अन् सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या विशेष निधीतून मालगुंड येथे प्राणी संग्रहालयाची सुरक्षा भिंत बांधणे, या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.
या वेळी सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

उदय सामंत

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की,

१. जिल्ह्यात प्राणी संग्रहालय व्हावे, ही आपली २००४ पासूनची इच्छा पूर्ण होत आहे. यासाठी आपण मंत्री असलेल्या विभागाच्या माध्यमातून प्राणी संग्रहालयासाठी ७४ कोटी रुपयांचा निधी संमत असून, सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून ८ कोटी रुपयांचा निधी प्राणी संग्रहालयाची सुरक्षा भिंत बांधण्यासाठी संमत करण्यात आला आहे.

२. आरे-वारे, गणपतीपुळे, मल्टीमीडिया शो बरोबरच प्राणी संग्रहालय झाल्याने येथे पर्यटकांमध्ये वाढ होईल. त्या समवेतच येथे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल.

३. वर्षाचे ३६५ दिवस येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. येथील भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास होईल. या प्राणी संग्रहालयासाठी माफक दरामध्ये भूमी दिलेल्या भूमीमालकांचे आभार मानतो.

४. तुमची मला अधिक काळजी आहे. या प्रकल्पामुळे आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. आपल्यावर कोणतेही संकट येणार नाही. येथील नागरिकांच्या सर्व शंकांचे निरसन करूनच येथे सुसज्ज असे प्राणी संग्रहालय उभे राहील.