पवना बंदिस्‍त जलवाहिनी प्रकल्‍प कायमस्‍वरूपी बंद करण्‍यासाठी ठाकरे गटाचा ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ !

पिंपरी (पुणे) – पवना बंदिस्‍त जलवाहिनी प्रकल्‍प कायमस्‍वरूपी बंद करावा, पुन्‍हा कार्यान्‍वित करू नये, या मागणीसाठी मावळ तालुका उद्धव ठाकरे पक्षाच्‍या वतीने पवनानगर येथे ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ काढण्‍यात आला. या वेळी याविषयीचे निवेदन अपर तहसीलदार अजित दिवटे यांना देण्‍यात आले. या मोर्चाला काँग्रेस, जमीन हक्‍क कृती समिती, मावळ धरणग्रस्‍त कृती समिती यांनी पाठिंबा दर्शवला होता.

पवना बंदिस्‍त जलवाहिनी प्रकल्‍पावरील स्‍थगिती उठवून सरकारने मावळ येथील सहस्रो शेतकर्‍यांचा अपमान केला आहे. या बंदिस्‍त जलवाहिनी विरोधात शेतकर्‍यांनी प्राणांचे बलीदान दिले आहे. शेतकर्‍यांच्‍या भावना लक्षात घेऊन हा प्रकल्‍प कायमस्‍वरूपी रहित करावा, असे मावळवासियांचे मत आहे. अन्‍यथा ठाकरे गट मागे हटणार नाही, अशी चेतावणी या वेळी देण्‍यात आली.