‘आठव्‍या श्रेणी’चे भारतीय हिंदू !

डॉ. आनंद रंगनाथन्

भारतीय लोकशाहीत ‘धर्मनिरपेक्ष’ शब्‍द घुसडून ४७ वर्षे झाली. ‘आमच्‍याकडे जे काही ‘हिंदू’ म्‍हणून आहे, ते ‘धर्मांध’च असते, तर आभाळाखाली जे-जे अहिंदु म्‍हणून गणले जाते, त्‍यास ‘धर्मनिरपेक्ष’ या सुरेख नावाने प्रोत्‍साहन देण्‍यास आम्‍हाला अभिमान वाटतो’, अशी आमच्‍या बहुतांश राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आदींची हिंदुविघातक धारणा आहे. या सर्वांचा समाचार घेणारे प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ डॉ. आनंद रंगनाथन् यांच्‍या ‘हिंदूज इन हिंदु राष्‍ट्र : एट्‍थ क्‍लास सिटिझन्‍स अँड व्‍हिक्‍टिम्‍स ऑफ स्‍टेट सँक्‍शन्‍ड अपारथीड’ या पुस्‍तकामध्‍ये भारतीय व्‍यवस्‍था हिंदूंसाठी किती निष्‍ठूर आहे, यावर प्रकाश टाकण्‍यात आला आहे. ‘हिंदूंना सापत्नपणाची वागणूक मिळते’, असे म्‍हणणेसुद्धा त्‍यांच्‍यावरील अन्‍यायाच्‍या तीव्रतेला ‘न्‍याय’ देऊ शकत नाही, हेच या पुस्‍तकाचे वाचन केल्‍यावर लक्षात येईल. ‘हिंदु राष्‍ट्रातील हिंदू : आठव्‍या श्रेणीचे नागरिक आणि सरकारसमर्थित वंशवादाचे बळी’, असा पुस्‍तकाच्‍या नावाचा तसा शब्‍दश: अर्थ !

डॉ. रंगनाथन् म्‍हणतात, जर हिंदु मंदिरांवर अधिराज्‍य गाजवण्‍यासाठी धर्मनिरपेक्ष लोकशाही असतांना काँग्रेसने घटनाबाह्य कायदे संमत केले, तर त्‍याच लोकशाहीच्‍या आधारे भाजप सरकार हिंदु मंदिरांचे सरकारीकरण का थांबवू शकत नाही ? ‘काश्‍मिरी हिंदू हे ज्‍यू आहेत; परंतु दुर्दैव हे की, भारत हे इस्रायल नव्‍हे !’, या डॉ. रंगनाथन् यांच्‍या एका वाक्‍यात काश्‍मिरी हिंदूंवरील अत्‍याचारांची स्‍थिती लक्षात येते. ‘४० सहस्र रोहिंग्‍यांना काश्‍मीरमध्‍ये जागा मिळते; पण ७ लाख काश्‍मिरी हिंदूंचे काय ? ‘वक्‍फ कायदा १९९५’ आणि ‘शिक्षणाचा अधिकार कायदा २००९’ हे कशा प्रकारे हिंदूंच्‍या मुळावर उठले आहेत’, याचे नेमकेपणाने भाष्‍य या पुस्‍तकाद्वारे करण्‍यात आले आहे. आज हिंदूंच्‍या प्रथा-परंपरा, चालीरिती आदींना पालटण्‍यामध्‍ये आमच्‍या लोकप्रतिनिधींना प्रौढी वाटते, तर मुसलमानांच्‍या जाचक प्रथा उलथवणार्‍या सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयालाच कायदा करून उलथवून लावण्‍यात येते ? न्‍यायाधीश हिंदूंच्‍या सणांना ‘भ्रामक’ संबोधून हिणवतात, तर मोहरम्‌सारख्‍या भयावह सणांच्‍या विरोधात ते चकार शब्‍दही काढत नाहीत. हिंदूंच्‍या गौरवशाली इतिहासाच्‍या प्रतिकांकडे कानाडोळा केला जातो, तर देशावर आक्रमण करणार्‍या इस्‍लामी आक्रमणकर्त्‍यांची नावे विविध रस्‍ते, रेल्‍वेस्‍थानके, शहरे, जिल्‍हे यांना देऊन त्‍यांचा उदो उदो होत आहे. हिंदूंच्‍या मंदिरांना जमीनदोस्‍त करून इस्‍लाम धर्माचे गोडवे गाणार्‍या क्षेत्रांना ‘धार्मिक स्‍थळ कायदा १९९१’कडून संरक्षण मिळते.

अशा प्रकारे हिंदूंचीच लोकशाही, त्‍यांचेच लोकप्रतिनिधी, त्‍यांचीच राज्‍यघटना, न्‍यायालये त्‍यांची लक्‍तरे वेशीवर टांगत आहेत. हिंदूंवरील या भयावह दुरवस्‍थेसारखे दुसरे कोणते उदाहरण जागतिक इतिहासात नसेल. अर्थात् यावर रडगाणे गात रहाण्‍यापेक्षा हिंदु सिंहाने त्‍याची क्षमता ओळखली पाहिजे. त्‍याच्‍यावरील आघातांना उलथवून लावणार्‍या हिंदु राष्‍ट्रासाठी कंबर कसली पाहिजे. अन्‍यथा सर्वनाश हा अटळ आहे आणि शत्रू दारावर नाही, तर घरात घुसला आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे एवढेच !