सरकारकडून तात्‍काळ पावले उचलली जातील, असे आंदोलन व्‍हायला हवे ! – राज ठाकरे, मनसे

राज ठाकरे, मनसे

पनवेल – रस्‍ते आस्‍थापनाच्‍या अध्‍यक्षांसह अनेक लोक आहेत; पण पक्ष म्‍हणून तुम्‍हाला यात उतरावे लागेल. पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत सर्वांनाच उतरावे लागेल. आवश्‍यकतेनुसार एकमेकांना सहकार्य करावे लागेल. आपल्‍याला लोकांना त्रास द्यायचा नाही, हे लक्षात ठेवा; पण आंदोलन अशा प्रकारचे झाले पाहिजे की, सरकारकडून तात्‍काळ पावले उचलली गेली पाहिजेत. लोकांना चांगला आणि उत्तम रस्‍ता मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन मनसेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी केले. गेल्‍या १२-१३ वर्षांपासून रखडलेल्‍या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्‍यासाठी येथे वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात निर्धार मेळावा आयोजित करण्‍यात आला होता. त्‍या वेळी ते बोलत होते.

ते पुढे म्‍हणाले, ‘‘कोकणात उद्योग आलेच पाहिजेत; पण कोकणचे सौंदर्य राखले गेले पाहिजेत. असा प्रदेश सहसा मिळत नाही. महाराष्‍ट्राला परमेश्‍वराची कृपा मिळाली आहे. ती जपावी. मी तुमच्‍यासोबत आहेच, जेथे माझी गरज लागेल, तेथे तुम्‍ही मला हक्‍काने बोलवा.’’

माणगाव येथे कंत्राटदाराचे कार्यालय मनसेने फोडले !

राज ठाकरे यांच्‍या भाषणानंतर माणगाव येथे महामार्ग सिद्ध करणार्‍या पहिल्‍या कंत्राटदाराचे कार्यालय मनसे सैनिकांनी फोडले.