देहली येथील पू. संजीव कुमार (वय ७२ वर्षे) आणि पू. (सौ.) माला कुमार (वय ६८ वर्षे) यांच्‍या संत सन्‍मान सोहळ्‍याच्‍या वेळी संतांनी सांगितलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये !

देहली आणि उत्तर भारतातील काही राज्‍ये (हरियाणा आणि पश्‍चिमी उत्तरप्रदेश) यांत सनातन संस्‍थेचे जे कार्य वाढीस लागले आहे, ते संत पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्‍यामुळे ! त्‍यांची पुढील प्रगती आणि कार्य अधिक जलद गतीने होईल, याची मला खात्री आहे !’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२४.७.२०२३) (महर्षींच्‍या आज्ञेनुसार डॉ. जयंत आठवले यांना ‘सच्‍चिदानंद परब्रह्म’ ही उपाधी लावतात. )

२३.१२.२०२१ या दिवशी देहली येथील सनातनचे ११५ वे संत पू. संजीव कुमार आणि सनातनच्‍या ११६ व्‍या संत पू. (सौ.) माला कुमार यांचा संत सन्‍मान सोहळा झाला. या सोहळ्‍याला उपस्‍थित असणार्‍या संतांनी सांगितलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

१. सद़्‌गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१ अ. पू. संजीव कुमार यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये

पू. संजीव कुमार

१ अ १. पू. संजीवभैय्‍यांचे घर म्‍हणजे आश्रमच असणे : ‘पू. संजीवभैय्‍या त्‍यांच्‍या घराचा आश्रम करण्‍याचा सतत प्रयत्न करतात; परंतु जेव्‍हा मी उत्तर भारतात प्रथमच आलो, तेव्‍हा ‘त्‍यांचे घर आधीपासूनच आश्रमासारखे आहे’, असे मला जाणवले. कुठल्‍या ना कुठल्‍या सेवेच्‍या निमित्ताने साधकांना त्‍यांच्‍या घरी जावे लागायचे. त्‍या वेळी पू. संजीवभैय्‍या त्‍यांचे नातेवाईक आणि मित्र यांच्‍यापेक्षा साधकांना अधिक वेळ द्यायचे. तेव्‍हा ‘साधकांना काही अडचण येऊ नये’, असा त्‍यांचा भाव असायचा.

‘पू. संजीवभैय्‍या आणि पू. मालादीदी यांनी त्‍यांच्‍या घराचे आश्रमात रूपांतर केले अन् गृहस्‍थाश्रमात राहून स्‍वतःच्‍या जीवनाचे अध्‍यात्‍मीकरण केले’, हे सूत्र मी सतत अनुभवले आहे.

१ अ २. साधकांना साहाय्‍य करण्‍यास तत्‍पर असणे : सेवाकेंद्रातील साधकांनी त्‍यांच्‍या कोणत्‍याही अडचणी पू. मालादीदी आणि पू. संजीवभैय्‍या यांना सांगितल्‍यावर ते त्‍वरित साधकांना साहाय्‍य करायचेे. सनातनचे ग्रंथ किंवा एखादी वस्‍तू (त्‍यांच्‍या घरी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने यांचा साठा असतो.) आणायची असो किंवा साधकांच्‍या वैयक्‍तिक अडचणी असोत, ते साहाय्‍य करण्‍यास तत्‍पर असायचे. त्‍यामुळे सर्व साधकांना त्‍यांचा आधार वाटत असे.

१ अ ३. मोकळे आणि निर्मळ मन : पू. संजीवभैय्‍या आणि पू. मालादीदी दोघेही मनमोकळेपणाने आणि सहजतेने बोलतात. ते लहान मुलासारखे मनात काहीही न ठेवता बोलतात. हा गुण गुरुदेवांना अधिक प्रिय आहे. ज्‍याचे मन मोकळे आणि निर्मळ आहे, त्‍याच्‍या मनात गुरुदेवांचेच प्रतिबिंब उमटते.

१ अ ४. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची सेवा भावपूर्ण करणे : श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ दौर्‍यावर असतांना पू. संजीवभैय्‍यांच्‍या घरी येत असतात. तेव्‍हा पू. संजीवभैय्‍या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना गुरुरूपात पाहून त्‍यांची भावपूर्ण सेवा करण्‍याचा प्रयत्न करतात.

१ अ ५. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याविषयीचा कृतज्ञताभाव : पू. संजीवभैय्‍या नेहमी म्‍हणतात, ‘‘एक वेळ अशी होती की, माझा व्‍यवसाय शून्‍यावर आला होता. आज आम्‍ही जे काही उभे आहोत, ते गुरुदेवांमुळेच आहे.’’ आता या घटनेला २१ वर्षे होऊन गेली; परंतु त्‍यांच्‍या बोलण्‍यात आजही तोच कृतज्ञताभाव जाणवतो आणि त्‍याच तळमळीने ते हे सांगत असतात. ‘माझे काहीच नाही. सर्वकाही देवाचेच आहे’, हा भाव त्‍यांच्‍यामध्‍ये निरंतर जागृत असतो. ते त्‍यांच्‍या आध्‍यात्मिक जीवनाचे एक रहस्‍य आहे.

‘पू. संजीवभैय्‍यांसारखे संतरत्न देऊन गुरुदेवांनी उत्तर भारतातील साधकांवर कृपा केली आहे’, याबद्दल आम्‍ही परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

१ आ. पू. (सौ.) माला कुमार यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये

पू. (सौ.) माला कुमार

१ आ १. सेेवेची तळमळ : ‘पू. (सौ.) माला कुमार यांची प्रकृती बरी नसते. त्‍यांचे औषधोपचारही चालू असतात; परंतु सनातनचे ग्रंथ किंवा सात्त्विक उत्‍पादने हवी असल्‍याचा कुणाचा भ्रमणभाष आला, तर त्‍या स्‍वतःचे आजारपण विसरून सेवा करतात. कोरोना महामारीच्‍या काळात त्‍यांना घराबाहेर जाता येत नव्‍हते. तेव्‍हा त्‍यांनी एक झोळी तयार केली. त्‍या झोळीत सात्त्विक उत्‍पादने, ग्रंथ आणि पैसे ठेवून पू. दीदी ती झोळी घराच्‍या वरच्‍या मजल्‍यावरून तळमजल्‍यावर सोडत असत. अशा प्रकारे त्‍या झोळीतून साहित्‍य आणि पैसे यांची देवाण-घेवाण करत असत.

१ आ २. प्रेमभाव : पू. मालादीदी यांच्‍याकडे कुणी सात्त्विक उत्‍पादने घेण्‍यास आले की, ‘सेवाकेंद्रात कोणत्‍या अडचणी आहेत ? साधकांना कोणत्‍या वस्‍तू लागतील ? आणखी काय द्यायला पाहिजे ?’, याचा पूर्ण विचार करून त्‍या उत्‍पादने देतात. त्‍या आई-वडिलांप्रमाणे सर्व साधकांची काळजी घेतात. ‘यातच त्‍यांचे संतपद दडले आहे’, असे मला वाटते. त्‍यांच्‍यामध्‍ये ‘निरपेक्ष प्रीती’ हा गुण आहे. त्‍या पूर्णवेळ साधना करणार्‍या साधकांना आणि आम्‍हालाही सतत साहाय्‍य करत असतात.

१ आ ३. अहं अल्‍प असणे : पू. माला कुमार यांना वाटते, ‘संत होण्‍यासाठी मी काहीच केले नाही. ही गुरुदेवांची कृपा आहे.’ यातून त्‍यांचा अहं अल्‍प असल्‍याचे लक्षात येते आणि हेच संतत्‍वाचे लक्षण आहे.

१ आ ४. पू. माला कुमार यांच्‍या संदर्भात साधकांना विविध अनुभूती येणे : त्‍यांच्‍या संदर्भात साधकांना अनेक अनुभूती आल्‍या आहेत. कुणाला प्रकाश दिसला, कुणाला दैवी कण दिसले, तर कुणाला लक्ष्मीचे दर्शन झाले. त्‍यांना पाहून कुणी शक्‍ती, तर कुणी आनंद अनुभवला. काहींचे मन निर्विचार झाले, तर कुणाचा नामजप चालू झाला. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने त्‍यांच्‍यामधील ईश्‍वरी शक्‍ती जागृत झाली आहे. ती त्‍यांच्‍या कळत-नकळतच कार्य करते. ही सहजावस्‍था आहे. ही सहजावस्‍था समजणे पुष्‍कळ कठीण असते.

‘पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांनी उत्तर भारतात अध्‍यात्‍मप्रसाराचे कार्य चालू केले आहे. ‘ते करत असतांना त्‍यांची सर्व साधकांना समवेत घेऊन विहंगम गतीने आध्‍यात्मिक उन्‍नती व्‍हावी’, अशी मी गुरुदेवांच्‍या चरणी प्रार्थना करतो आणि पू. संजीव कुमार अन् पू. (सौ.) माला कुमार यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

२. पू. प्रदीप खेमका (सनातनचे ७३ वे संत, वय ६३ वर्षे), धनबाद

पू. प्रदीप खेमका

२ अ. पू. संजीवभैय्‍यांनी साधनेचा मार्ग दाखवल्‍यामुळे त्‍यांच्‍याबद्दल कृतज्ञता वाटणे : ‘वर्ष १९९९ मध्‍ये संजीवभैय्‍यांच्‍या घराजवळ सनातन संस्‍थेचा एक सत्‍संग चालू होता. संजीवभैय्‍या मला त्‍या सत्‍संगात घेऊन गेले होते आणि त्‍यांनी मला एका कागदावर एका बाजूला ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ आणि दुसर्‍या बाजूला ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हे नामजप लिहून दिले होते. त्‍यांनी ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ या नामजपाखाली ‘विविध जीवनसत्त्वे असलेले, म्‍हणजे ‘मल्‍टीव्‍हिटॅमिन’ असे लिहिले होते आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाखाली जंतूनाशक (अँटिबायोटिक)’, असे लिहिले होते. त्‍या वेळी याचा अर्थ समजावून सांगतांना त्‍यांनी मला सांगितले होते, ‘‘श्री कुलदेवतायै नमः।’, हा नामजप दिवसभरातील २३ घंटे ४५ मिनिटे करायचा आहे आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा जप केवळ १५ मिनिटे करायचा आहे.’’ त्‍यांनी सांगितल्‍याप्रमाणे मी दोन्‍ही नामजप केले. तेव्‍हापासून मी संजीवभैय्‍यांना माझे ‘मार्गदर्शक’ मानतो. मला त्‍यांच्‍या चरणी अत्‍यंत कृतज्ञता वाटते; कारण त्‍यांनी मला प.पू. गुरुदेवांच्‍या चरणी आणले. आज माझ्‍या आनंदाला पारावार राहिला नाही. माझे मार्गदर्शक संतपदी विराजमान झाले आहेत.

२ आ. पू. संजीवभैय्‍यांनी व्‍यवहारासह आध्‍यात्मिक प्रवासातही पुष्‍कळ साहाय्‍य केलेले असणे : २० – २२ वर्षांत आम्‍ही एकत्र राहून पुष्‍कळ कार्य केले आहे. मी जेव्‍हा त्‍यांच्‍याकडे जायचो आणि त्‍यांना भेटायचो, तेव्‍हा प्रत्‍येक क्षणी आमचे गुरुदेवांविषयीच बोलणे होत असे. ‘सर्वकाही गुरुदेवच करतात’, असे आम्‍ही बोलायचो. ‘प्रत्‍येक क्षणी कृतज्ञताभावात कसे रहायचे ?’, हे मी पू. संजीवभैय्‍या यांच्‍याकडून शिकलो. त्‍यांनी मला पुष्‍कळ काही शिकवले आहे. त्‍यांनी मला व्‍यवहारासह आध्‍यात्मिक प्रवासातही पुष्‍कळ साहाय्‍य केले आहे.

२ इ. गुरुपौर्णिमेच्‍या वेळी पू. संजीवभैय्‍या प्रवचन करत असतांना ‘प.पू. गुरुदेव प्रवचन करत आहेत’, असे वाटणे : आमचे संपूर्ण कुटुंब साधनेत आहे. त्‍यामागे पू. संजीवभैय्‍यांचे सर्वार्ंत मोठे योगदान आहे. वर्ष २००१ मध्‍ये धनबादमध्‍ये गुरुपौर्णिमा होती. माझे आई-वडील, पत्नी आणि मुले गुरुपौर्णिमेला गेले होते. गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी संजीवभैय्‍या ‘समाजसाहाय्‍य, राष्‍ट्ररक्षण आणि धर्मजागृती’, या विषयावर प्रवचन करत होते. तेव्‍हा ‘तेथे पू. संजीवभैय्‍या प्रवचन करत आहेत’, असे वाटतच नव्‍हते, तर ‘प.पू. गुरुदेव प्रवचन करत आहेत’, असेच सर्वांना वाटत होते. त्‍या प्रवचनानंतर माझे वडील त्‍यांना म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही एवढ्या चांगल्‍या प्रकारे प्रवचन करता’, असे मला वाटलेच नव्‍हते !’’

२ ई. भाव : त्‍यांच्‍या बोलण्‍यात मला नेहमी कृतज्ञताभाव आणि त्‍यांच्‍या देहबोलीत (बॉडी लँग्‍वेजमध्‍ये) बालकभाव अनुभवायला मिळाला. त्‍यांचा साधकांप्रती जो भाव आहे, तो निश्‍चितच अतुलनीय आहे.’

३. पू. (सौ.) सुनीता खेमका (सनातनचे ८४ व्‍या संत, वय ६२ वर्षे)

पू. (सौ.) सुनीता खेमका

अ. ‘पू. संजीवभैय्‍या मला पुष्‍कळ वेळा नामजपाची आठवण करून देत असत. त्‍यांनीच मला या साधनामार्गावर आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या चरणी आणले आहे. मी पू. संजीवभैय्‍या आणि पू. मालादीदी यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.५.२०२३)


पू. संजीवभैय्‍या आणि पू. मालादीदी संत होण्‍याविषयी मिळालेली पूर्वसूचना

‘२३.१२.२०२१ या दिवशी दुपारी १.१० वाजता माझे संजीवभैय्‍या आणि मालादीदी यांच्‍याशी भ्रमणभाषवर बोलणे झाले. मला मागील ३ – ४ दिवसांपासून ‘त्‍यांच्‍याशी बोलावे’, असे वाटत होते. मला सारखे वाटत होते, ‘पू. संजीवभैय्‍या आणि पू. मालादीदी रामनाथी आश्रमात जाऊन आले आहेत. या वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टर निश्‍चितच ‘संजीवभैय्‍या आणि मालादीदी संत झाले आहेत’, अशी घोषणा करतील’ अन् त्‍याच दिवशी सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी ‘संजीवभैय्‍या संतपदी विराजमान झाले’, असे सांगितलेे.’

– (पू.) प्रदीप खेमका, धनबाद (१६.५.२०२३)


संत सन्‍मान सोहळ्‍यानंतर पू. संजीव कुमार यांनी व्‍यक्‍त केलेले मनोगत ! 

सनातन संस्‍थेत आल्‍यानंतर मी साधनेतील तृप्‍ती अनुभवली ! : ‘सनातन संस्‍थेत आल्‍यानंतर मला ‘अन्‍य कोणत्‍याही संस्‍थेत जाऊन साधना करावी’, असे वाटले नाही. येथे मी तृप्‍ती अनुभवली. मला अनुभूतींच्‍या माध्‍यमातून ईश्‍वराला पहाता आले. मी ईश्‍वराच्‍या चरणी कृतज्ञ आहे. संत होण्‍यात माझे काहीच कर्तृत्‍व नाही. मी काही करू शकत नाही. ‘तुम्‍हीच सर्वकाही करून घ्‍यावे’, ही गुरुदेवांच्‍या आणि आपणा सर्व साधकांच्‍या चरणी माझी प्रार्थना आहे. ‘मी संत आहे. तुम्‍हीही संत आहात. आपण सर्व जण संत आहोत’, हा भाव ठेवून पुढील जीवनात मी साधना करीन. नमस्‍कार !’

– (पू.) संजीव कुमार, देहली (१६.५.२०२३)