सोलापूर विद्यापिठात २४ जुलैला होणार ‘पर्यावरण दूत’ धीरज वाटेकर यांचा सन्मान

‘पर्यावरण दूत’ पुरस्कार – २०२३ साठी झाली निवड

पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते, लेखक-पत्रकार श्री.धीरज वाटेकर

चिपळूण – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि पुणे येथील हरित मित्र परिवार लोक विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदान करण्यात येणारा ‘पर्यावरण दूत’ पुरस्कार येथील कोकण पर्यटन आणि पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते, लेखक-पत्रकार श्री.धीरज वाटेकर यांना देण्यात येणार आहे. विद्यापिठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. डॉ. आर्.के. वडजे आणि पुण्याच्या हरित मित्र परिवार लोक विद्यापिठाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र घागरे यांनी ही निवड नुकतीच घोषित केली आहे. पर्यावरण विषयाचा प्रचार-प्रसार, संवर्धन आणि जतन करण्याकामी अविरतपणे करत असलेल्या योगदानासाठी ही निवड करण्यात आल्याचे विद्यापिठाने पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विद्यापीठ सभागृहात कुलगुरूंच्या उपस्थितीत २४ जुलै या दिवशी होणार आहे.

ज्येष्ठ समाजसेवक ‘पद्मभूषण’ अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांनी स्थापन केलेल्या निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे धीरज वाटेकर हे सचिव आहेत. वाटेकर यांची ‘पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यामध्ये चिपळूण तालुका पर्यटन, श्री परशुराम तीर्थक्षेत्र दर्शन (मराठी अन् इंग्रजी), श्रीक्षेत्र अवधूतवन, ठोसेघर पर्यटन ही ५ पर्यटनविषयक आणि ग्रामसेवक ते समाजसेवक, प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी, कृतार्थीनी, जनी जनार्दन या ४ चरित्र लेखनांचा समावेश आहे. ‘गेट वे ऑफ दाभोळ’ आणि ‘वाशिष्टीच्या तीरावरून’ या २ संशोधित ग्रंथांची निर्मिती, ‘व्रतस्थ’ या ज्येष्ठ कोकण इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांच्यावरील पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे.

त्यांनी लिहिलेले आणि नुकतेच उपलब्ध झालेले, ‘हाफकिन’ मुंबई यांनी शोधलेल्या विंचूदंशावरील लसीचे ‘प्रवर्तक’ आमदार डॉ. श्रीधर दत्तात्रेय उपाख्य तात्यासाहेब नातू या दैवी अंश लाभलेल्या डॉक्टरांचे ७०८ पानी चरित्र हे त्यांचे नववे पुस्तक आहे. या चरित्राला देशातील द्रष्टेनेते आणि प्रयोगशील केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची प्रस्तावना लाभलेली आहे. ‘संदर्भांची रेलचेल असलेला अवडंबरहीन आणि रसाळ दस्तावेज’ अशा शब्दांत गडकरी यांनी या चरित्राचे वर्णन केले आहे. विसाव्या शतकातील ग्रामीण कोकणचे प्रतिनिधित्व करणारे, आजच्या काळात उद्ध्वस्त होत असलेल्या, भारतीय संस्कृतीने उदात्त ठरवलेल्या मूल्यव्यवस्थेचे दर्शन घडवणारे असे हे चरित्र असून याद्वारे विंचूदंशावरील लसीच्या निर्मितीची कहाणी वाचकांना प्रथमच उपलब्ध होत आहे.

वाटेकर हे कोकण इतिहास आणि संस्कृती, निसर्ग आणि पर्यावरण, ग्रंथ चळवळ, पर्यटन, आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी विविध अभ्यासदौरे, निसर्ग, लेणी, पर्यटन अभ्यास, जंगलभ्रमण याकरता हिमाचल, कन्याकुमारी ते अंदमान आणि भूतान देशांचा प्रवास केला आहे. पर्यटन, पर्यावरण संवर्धन, बिगरमोसमी जंगलपेर अभियान, वृक्ष लागवड, बीजपेरणी अभियान, चंदन लागवड अभियान, पर्यावरण जनजागृती, रमणीय निसर्ग छायाचित्रण, ग्रंथालय चळवळ कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. ते राज्यभरातील विविध नियतकालिकांतून गेली २५ वर्षे लेखन करत आहेत. त्यांच्या पर्यावरणीय प्रबोधन भूमिकांचे यापूर्वी ‘पद्मभूषण’ अण्णा हजारे, ‘पद्मभूषण’ डॉ. माधव गाडगीळ, ‘पद्मश्री’ राहीबाई पोपेरे, ‘पद्मश्री’ डॉ. विकास महात्मे आदींनी निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या विविध कार्यक्रमात कौतुक केले आहे.