शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांना सोडल्यावर त्यांनाही वाईट वाटले असेल ! – छगन भुजबळ, मंत्री, महाराष्ट्र

मुंबई – मी बाळासाहेब ठाकरे यांना सोडले, तेव्हा त्यांनाही वाईट वाटले. धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांना सोडले, तेव्हा त्यांना आणि पंकजा मुंडे यांनाही वाईट वाटले. शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांना सोडले, तेव्हा त्यांनाही वाईट वाटले असेल, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर तोफ डागली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.

या वेळी छगन भुजबळ म्हणाले, ‘‘वर्ष २०१९ मध्ये अजित पवार भाजपसमवेत कुणाच्या सांगण्यावरून गेले, हे जनतेला कळायला हवे. शरद पवार यांनी अजित पवार यांना तोंडघशी पाडले. शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले, याविषयी आम्हाला सांगण्यात आले नव्हते. शरद पवार आमचे विठ्ठल आहेत; मात्र त्यांना बडव्यांनी घेरले आहे. या बडव्यांनी वाटोळे करण्याचा विडा उचलला आहे. ज्याप्रमाणे नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपसमवेत जाण्याची अनुमती देण्यात आली, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपसमवेत जाण्यासाठी आम्हाला अनुमती द्यावी.’’